चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- पावसाळ्याचे पाणी साचून जिवतीतील मुख्य मार्गावर चिखल झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून चिखलामुळे अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे.उन्हाळ्यात इथली संपूर्ण कामे पुर्ण व्हायला पाहिजे होती मात्र संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पावसाळ्यात काम सुरू केल्याने नागरिकांना व वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत या संपूर्ण बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी केली आहे.
जिवतीतील शांतीनगर पासून तर बांधकाम विभागापर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यात आले आणि घोगरे काॅम्पलेक्स पासून तर बालाजी आगलावे यांच्या घरापर्यंत नगरपंचायत मार्फत सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यात आले मात्र या दोन्ही रस्त्याच्या मधोमध माती पसरवून कंत्राटदार मोकळे झाले आहेत.भोयगाव-जिवती-परमडोली हा राज्य मार्ग जिवतीच्या मुख्य शेडमाके चौकातून पार होत आहे त्यामुळे सदर काम आर.के.कंट्राक्शनकडून प्रशासनाने पुर्ण करुन घ्यायला पाहिजे होते.
उन्हाळाभर या रखडलेल्या कामाकडे कुणीही लक्ष दिले नाही.जसा पावसाळा सुरू होऊन मुख्य चौकात चिखल झाला आणि चिखलात घसरून वयोवृद्ध महिला व पुरुषसह बाईकस्वार पडू लागले तेव्हा प्रशासनाला जाग आली आणि सदर काम करण्याची घाई केली आहे.प्रशासनाने या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांना कुठलाही त्रास न होता तातडीने सिमेंट काॅंक्रिटीकरण करून नागरिकांना रस्ता सोयीचे करून द्यावी अशी मागणी जिवती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष (शरद पवार गट) लक्ष्मण शिंदे यांनी केली आहे.