रामचंद्र घंगारे एक आदर्श राजकीय नेते होते – इमरान राही
काॅमरेड रामचंद्र घंगारे जीवनावरील पुस्तकाचे विमोचन संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘माणूस जीवन किती जगला हे महत्वाचे नसून कसा जगला हे जास्त महत्वाचे आहे. रामचंद्र घंगारे यांनी जीवनभर कामगार, कष्टकरी तसेच सामान्य माणसांकरीता काम केले. अन्यायाविरुद्ध लढा दिला व न्याय मिळवून दिला. आपले संपुर्ण जीवन लोकांकरिता झिजले व असे करताना संपत्ती, सुख व आरामदायक जीवनापासून दुर राहीले. आजच्या काळात असा लोकनेता शोधून सापडत नाही. खऱ्या अर्थाने माजी खासदार रामचंद्र घंगारे एक आदर्श राजकीय नेते होते; असे प्रतिपादन स्थानिक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित ‘रामचंद्र घंगारे यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात समाजसेवी तथा हिन्दी व उर्दू चे साहित्यिक इमरान राही यांनी 16 जून रोजी मार्गदर्शन करताना केले.
माजी खासदार तथा कामगार नेते स्व. रामचंद्र घंगारे यांच्या जीवनावरील जेष्ठ पत्रकार प्रा. राजू गोरडे लिखीत पुस्तक विमोचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा उद्योजक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष तथा एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर, साहित्यिक इमरान राही, कामगार नेते यशवंत झाडे, माजी मुख्याध्यापक रामेश्वर लांडे व पुस्तकाचे लेखक प्रा. राजू गोरडे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मोहनबाबू अग्रवाल म्हणाले आजच्या राजकीय परिस्थितीत रामचंद्र घंगारे यांच्या सारख्या नेत्यांची आपल्या देशाला नितांत गरज आहे तर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले आजच्या तरुणाई पुढे रामचंद्र घंगारे यांच्या सारखे आदर्श नेते नसल्यामुळे समाजकारण व राजकारण कसे असावे याबाबत योग्य मार्गदर्शकाची गरज आहे.
पुस्तकाचे लेखक तथा जेष्ठ पत्रकार प्रा. राजू गोरडे यांनी प्रास्ताविक करून कामगार नेते रामचंद्र घंगारे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या प्रसंगी यशवंत झाडे यांनी रामचंद्र घंगारे यांच्या जीवनातील अनेक प्रेरक प्रसंग सांगून वातावरण मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजू गोरडे यांनी तर आभार जितेंद्र गोरडे यांनी मानले.