जिल्ह्यातील समस्यांचे तात्काळ निवारण करा.
जनसंघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन.
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अनेक समस्या नागरिकांना उध्दभवत असून प्रशासनाचा त्याकडे कानाडोळा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभेच्या निवडणूकीचे कारण सांगुन प्रशासन चंद्रपूर शहरासह जिल्हîातील समस्यांना बगल देत आहे. याकरीता जनसंघर्ष समिती चंद्रपूर द्वारा जिल्हाधिकाऱ्याना विविध समस्येसंदर्भात निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक नाले व गटारे भरलेली असून पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई प्रशासनामार्फत करण्यात यावी. त्यासोबतच शहरातील नाल्यांवरचे फुटलेले चेंबर तात्काळ बदलविण्यात यावे. यासोबतच जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
अनेक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे देखील यावेळी निवेदनातून जिल्हाधिकारी महोदयांना कळविण्यात आले. त्यासोबतच चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्वच्छता व गैरसोयीच्या तक्रारीचे निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यासोबतच सध्या शासनाच्या माध्यमातून रेती धोरण जाहीर न करण्यात आल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असल्याचे तक्रारीतून सांगण्यात आले. यासाठी शासनाने लवकरात लवकर रेती उपलब्ध करुन देऊन बांधकाम उद्योगास सुरळीत करावे, अशी विनंती देखील निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी सदर मागण्या रास्त असून यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन जनसंघर्ष समितीच्या सदस्यांना दिले. याप्रसंगी जनसंघर्ष समितीचे गोपाल अमृतकर, मयुर राईंकवार, अरुण भेलके, रामकृष्ण कोन्द्रा व शहजाद भाई यांची उपस्थिती होती.