बहिरम बाबा नगर वॉर्डातील वीज समस्येवर काँग्रेसच्या प्रयत्नाने कायमस्वरूपी तोडगा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : बहिरम बाबा नगर वॉर्डातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे हैराण झाले होते. भर उन्हाळ्यात घरातील फॅन, कूलर नीट चालत नव्हते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी संपूर्ण वॉर्डातील नागरिकांची स्वाक्षरी गोळा करून एक निवेदन काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडे सादर केले. नागरिकांची अडचण गांभीर्याने घेत, राजू रेड्डी यांनी तातडीने महावितरण कार्यालय गाठले आणि मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन वॉर्डातील वीज समस्या तातडीने सोडविण्याची विनंती केली.
राजू रेड्डी यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणने त्वरित पावले उचलली. दोन नवीन विद्युत पोल लावून, थ्री फेज वीज अन्य ठिकाणावरून पुरवठा करण्यात आला. परिणामी वॉर्डातील वीज समस्या कायमस्वरूपी सुटली आहे.
या समस्येवर जलद उपाययोजना केल्याबद्दल वॉर्डातील नागरिकांनी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.