ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत

चांदा ब्लास्ट

 शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ करिता आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अतंर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १६ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील सुधारित अधिसूचना नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. तथापि, एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची / शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून १ किलोमीटर पर्यंतच्या अतंरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्याशाळा नसतील व १ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवास स्थापासून १ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर शाळा नसेल तर ३ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमांने होतील. मुलांना २५ टक्के प्रवेशअंतर्गत प्रवेशासाठी महानगरपालिका शाळा, नगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत शाळा, कॅन्टोमेंट बोर्डशाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थ्सहाय्यीत),जिल्हा परिषद (माजी शासकीय),खाजगी अनुदानित, स्वयअर्थसहाय्यीत शाळा इ. व्यवस्थापनाच्याशाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी :

१. प्रवेश प्रक्रियेसाठी निवासी पुराव्याकरीता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज /टेलीफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक /घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ई. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य राहील. २. जन्म तारखेचा पुरावा ३. जातप्रमाणपत्र पुरावा (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे) ४. उत्पन्नाचा दाखला उ (उत्पन्नाचा दाखला रु. १ लाखापेक्षा कमी उत्पन्न) प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. ५. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुगणालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र ६. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता बालकाचे वय ६ वर्ष आणि अधिक गृहित धरताना मानिव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेली आहे. ७. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Singal Parent, विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल

शाळा पुढील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारू शकेल :

अवैध निवासाचा पत्ता, अवैध जन्मतारखेचा दाखल, अवैध जातीचे प्रमाणपत्र, अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अवैध फोटो आयडी, अवैध दिव्यांग प्रमाणपत्र. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. पडताळणी समितीद्वारे प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला ३ वेळा प्रवेशाकरिता संधी देवून पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करण्यात येईल.

पडताळणी समिती द्वारे रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याबाबत पात्र विद्यार्थ्यांची अचूक खात्री करण्यात येईल. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणप्रत्राची पडताळणी करण्यात येईल. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची सर्व पालकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. तरी इच्छूक व पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे सदर ऑनलाईन अर्ज विहित कालावधीमध्ये भरावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये