ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१३ चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

सुधीर मुनगंटीवार वाचविणार भाजपाची प्रतिष्ठा?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघातून चारदा निवडून आलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना २०१९ मध्ये मोदी लाटेत पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असताना मागच्या पराभवाचे शल्य पचवू न शकल्याने भारतीय जनता पक्षश्रेष्ठींनी त्यांचे तिकीट कापून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय या तीन खात्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नसताना सुद्धा मोठ्या अपेक्षेने लोकसभेची उमेदवारी जाहिर केली. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

        ६२ वर्षीय सुधीर मुनगंटीवार १९८७ पासून राजकारणात सक्रिय आहेत. चार वेळा चंद्रपूर तर तीन वेळा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ही त्यांनी जबाबदारी सांभाळली. सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतः ला झोकून देणारा नेता, महाराष्ट्रातील राजकारणात एक उच्चविद्याविभूषित, प्रखर वक्ता, अभ्यासू, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ख्याती आहे.

        मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेस ‘ चारोखाने चित ‘ झाली. देशात काँग्रेसला मोजक्या जागांवर समाधान मानावे लागले. त्यात महाराष्ट्रात केवळ एकमात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला होता. भाजपाच्या हंसराज अहिर यांचा ४४ हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. देशात पुन्हा भाजपाला सत्ता मिळावी यासाठी मोदी – शहा जोडी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. वेगवेगळ्या राज्यात मित्र पक्षाशी जुळवून यावेळी ४०० पेक्षा जास्त जागा काबीज करण्याचा त्याचा मानस आहे. त्यासाठी खूप जपून पावले उचलली जात आहे. निवडून येईल अशाच उमेदवाराला उमेदवारी देण्याची भाजपाची रणनीती आहे. महाराष्ट्रातील राजकारणात भाजपामध्ये नितीन गडकरी यांच्या नंतर त्यांच्यासारखा दीर्घ अनुभव असलेला दुसरा नेता नाही.

भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आघाडीवर असलेल्या मुनगंटीवार यांनी आपल्या कार्याने वेळोवेळी मोदी – शहा या नेत्याचे लक्ष स्वतः कडे वेधले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकायचा या उद्देशाने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

       सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात १९८९ व १९९१ असे दोनदा चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढविली. परंतु त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ते सलग सातव्यांदा निवडून आले. त्यामुळे विधानसभाच बरी, लोकसभा आपल्यासाठी शुभ नाही, असा समज करून बहुतेक त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला असावा.

       क्षेत्रातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघात मागचा पराभव जिव्हारी लागल्याने पुन्हा पराभव होता कामा नये, त्यासाठी भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, म्हणूनच विजयश्री खेचून आणणारा उमेदवार हवा, असे हे ठरले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे कडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पद आहे त्यांच्या ऐवजी दुसरा कोण? तर या क्षेत्रासाठी नवीन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असावा. त्यात अनुभवी, जाणकार म्हणून मुनगंटीवार शिवाय दुसरा उमेदवार नसल्याने, मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेऊनच भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. हंसराज अहिर यांना वगळून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्याने ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहायला सुरुवात झाली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी सरळ लढतीची अधिक शक्यता आहे. यात सुधीर मुनगंटीवार यांना यश मिळते की अपयश हे येणारा काळच ठरवेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये