अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिवतीतील तलाव कोरडा
पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामातील शेतकरी चिंतेत ; तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी जिवती येथे सिंचाई विभागाने तलावाची निर्मिती केली मात्र संबंधित विभागाने त्या तलावाची देखभाल दुरुस्ती केली नाही किंवा त्या तलावाची देखरेख करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली नाही.त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला तलावाची पातळी घटल्याने परिसरातील रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे.तलावात जेमतेम पाणी साठा शिल्लक असून उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले जात आहे.
गेल्या २० वर्षांपासून पुर्वी निमिर्ती करण्यात आलेल्या तलावाची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होते.परंतु त्याकडे संबंधित विभागाने कधी फिरकूनही बघीतले नाही.या बेजबाबदार पणामुळे कॅनल गेट खराब होऊन धो-धो पाणी वाहून गेले.शेतकऱ्यांनी तक्रार दिली त्यानुसार अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली मात्र उपाययोजना करण्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलली नाही.त्यामुळे तलावाची पातळी घटल्याचे शेतकरी बोलत आहेत.अधिकाऱ्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व देखरेख करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली असती तर परिसरातील शेतकऱ्यांना हे पाण्याचे संकट भोगावे लागले नसते असेही शेतकरी सांगत आहेत.
यंदा निसर्गाने दगा दिल्यामुळे परिसरातील बहुसंख्य शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे.ज्वारी,मका,गव्हू,चना,भूईमुग पिकांची लागवड केली मात्र सिंचाई विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे त्या शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या.पिकात दाणे भरण्याआधीच पिके करपली जात आहेत.खरीप हंगामात उत्पन्न कमी अन् खर्च अधिक झाले.पिकवलेल्या मालाला भाव मिळाला नाही आणि आता हातात आलेला पिकही पाण्याअभावी करपू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर संकटच कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.परिसरातील नदी,नाले, विहिरीने तळ गाठला आहे आता पासूनच हि स्थिती असेल पुढील उन्हाळ्याच्या दिवसात पाळीव प्राण्यांना चारा पाण्याची सोय करायची कसं हा सर्वात मोठ कोडं शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
तलावातील गाळ काढण्याची गरज
तलाव निमिर्ती पासून अध्याप गाळ काढण्यात आला नसल्याने भुजलसाठाही पुरेसा प्रमाणात जमा होत नाही.त्यामुळे तलावातील गाळ काढल्यास परिसरातील शेतकऱ्यांना हा गाळ वापरता येईल आणि तलावाची खोली व रूंदीत वाढ होत पाणी साठवण्याची क्षमताही वाढेल त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.