छत्रपती संभाजी महाराज अवमान प्रकरण : चिमूरात आक्रोश निषेध मोर्चा
बाजारपेठ कडकडीत बंद ; आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चिमूर :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) अवमानकारक मजकूर टाकुन समाजात तेढ पसरविणाऱ्या चिमुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रविवारी (9 मार्च) चिमूर शहरातून निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये याकरीता प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली. चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेच्या निषेधार्थ नागरिक मोर्च्यात सहभागी झाले.
येथील आरोपी सोनू याने गुरूवारी सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) छत्रपती संभाजी महाजाच्या विरोधात अवमानकारक पोस्ट केली. दिवसभरानंतर या पोस्टच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले. त्याच रात्री संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठाणचे कार्यकर्त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याकरता तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिमूर पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी सोनू (वय 21) याला अटक केली. त्याच रात्री संभाजी चौकात संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन घटनेचा कडाडून निषेध केला. रात्री बारा ते एकच्या सुमारास चिमूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने वेळीच घटना नियंत्रणात आणली.
या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले, आज रविवारी चिमूर शहरात सकाळी हिंदू समाजाच्या वतीने आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याकरिता आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. बालाजी मंदिर मंदिरापासून मोर्चाला सकाळी 10 वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी शहरातून सकाळी 9 वाजता बाईक रॅली काढून सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली. मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा डोंगरवार चौक, नेहरु चौक, इंदिरा नगर नंतर तहसील कार्यालयात पोहचला.
या ठिकाणी तहसीलदार श्रीधर राजमाने यांना निवेदन देण्यात आले. हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट समाज माध्यमावर टाकल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात देशद्रोहाची कठोरकारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी निवेदनातून केली.त्यानंतर मोर्चा परत मासळ रोड, चावळी चौक, शिवाजी महाराज चौक, मुख्य बालाजी मंदिर येथे पोहचला. या ठिकाणी मोर्चा विसर्जित करण्यात आला. हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामुळे आज चिमूर शहरातील बाजारपेठ सकाळपासून पुन्हा बंद ठेवण्यात आली. नागरिकांनी मोर्चा सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
पार्श्वभूमी लक्षात घेता चिमूर शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 16 अधिकारी, 82 अमलदार, 1आरसीपी पथक , 44 सैनिक, 44 होमगार्ड आदींची तैनाती करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.