आयडी बी आय बँकेच्या लिंक फेलमुळे ग्राहकांना नाहक त्रास
दोन दिवसात बँकेचे सर्व व्यवहार पुर्वरत सुरु न केल्यास बँकेला कुलूप लावण्यात येईल - ग्राहकांचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे याकरिता व्याहाड बुज. येथे आयडीबीआय बँकेची शाखा आहे मात्र सलग १५ दिवसापासून लिंक फेल असल्याचे कारण सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवायचे काम सुरु असल्याने ग्राहकात संताप आहे.
आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँकेची गरज आहे. सर्व शासकीय आर्थिक व्यवहार बँकेमार्फत केल्या जातात. रोजगार हमी योजना, ग्रामीण भागात निराधार योजना, घरकुल योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, व इतर योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने बँकेला फार महत्व आहे. व्याहाड बुज भागातील जनतेकरिता आयडीबीआय बँक ही एकमेव बँक आहे. मात्र येथील अधिकारी कर्मचारी यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. मागील दोन आठवड्यापासून लिंक फेल कारणाने नवीन खाता उघडणे, खाता kyc करणे, बँलेन्स तपासणे या सारखे अनेक कामे बंद आहेत. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत व भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता परिसरात चर्चिली जात आहे.
ग्राहकांनी आयडीबीआय शाखा व्याहाड बुज. ला दिले निवेदन
ग्राहकांच्या मागण्या मान्य करून, ग्राहकाना येणाऱ्या समस्याचे त्वरित निराकरण करावे अशी मागणी ग्राहकाकडून होत आहे.
मागील १५ दिवसापासून बँकेची लिंक नसल्याने, आपल्या शाखेकडून ग्राहकाना भरपूर अडचणी निर्माण होत आहेत. लिंक असताना सुद्धा बँकेच्या भोंगळ कारभार मुळे नेहमीच ग्राहक त्रस्त असतात वारंवार येणाऱ्या विविध खालील सर्व समस्या व ग्राहकांच्या मागण्या मान्य करून ग्राहकाना योग्य सेवा पुरविण्यात याव्या हि विनंती.
१) बँकेमध्ये १५ दिवसापासून असलेली इंटरनेटची समस्या सोडवून बँकेचे सर्व व्यवहार दोन दिवसात सुरु करण्यात यावे.
२) नवीन खाते १० ते १५ दिवसात मिळण्यासाठी उपाययोजना कराव्या.
३) पासबुक प्रिंट करिता आलेल्या ग्राहकाना विविध कारणे सांगून परत करू नये.
४) खाता kyc करिता व मोबाईल लिंक करण्याकरिता एक ते दोन महिन्याचा कालावधी लागतो
ते कमी करून २ दिवसात होईल अशी उपाय योजना करण्यात यावी.
५) पिक कर्जाला लादलेली सिबिल रिपोर्ट ची अट रद्द करण्यात यावी.
६) पिक कर्ज वसुली करताना ग्राहकांच्या विनापरवाणगिने बचत खात्यातील पैसे कर्जात जमा करण्यात येऊ नये.
७) जास्तीत जास्त कर्ज वाटप हा शाखे अंतर्गत येणाऱ्याच गावांना देण्यात यावे, शाखेकडून जास्तीत जास्त कर्ज हे गडचिरोली जिल्ह्यात देत असल्याची माहिती आहे ते बंद करावे.
वरील सर्व मागण्याचे निवेदन देऊन या सर्व मागण्या येत्या दोन दिवसात मान्य करून बँकेचे सर्व व्यवहार पुर्वरत सुरु न केल्यास ग्राहकांकडून बँकेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सर्व मागण्याचे निवेदन देताना अनिल गुरूनुले, भाऊराव कोठारे,चेतन मोटघरे,सचिन इंगुलवार, सुनिल बोमनवार,अविनाश भुरसे, ऋषिकेश नगारे, दिपक गद्देवार,धनराज भांडेकर, डोमाजी शेंडे, मुन्ना भांडेकर, रुमाजी कोहळे, रोशन गुरुनुले, अरुण पाल, दिवाकर काचीनवार उपस्थित होते.
“या बँकेत नेहमी ग्राहकांना त्रास दिल्या जातो. आता तर दोन आठवड्यापासून व्यवहार ठप्प आहेत. अधिकारी लिंकची अडचण सांगत असतात. पण दोन दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर बँकेला टाळे ठोकू.”
-अनिल गुरुनुले
अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुका