जनआक्रोश आंदोलनाद्वारे उपवर्गीकरणासाठी एल्गार
सकल मातंग समाजाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- आझाद मैदान मुंबई येथे नुकतेच सकल मातंग समाजाच्या वतीने अनु जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण राज्यात तात्काळ लागू करावे या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. १ ऑगस्ट २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाने अनु. जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करता येते आणि ते करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत असा निर्वाळा दिलेला आहे. त्यास अनुसरून तेलंगणा सरकारने १४ एप्रिल २०२५ ला राजपत्र काढून अनु. जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचे अनुकरण करून महाराष्ट्र सरकारनेही राज्यामध्ये तात्काळ अनु. जाती आरक्षणाचे उपवार्गीकरण लागू करावे अशी भूमिका या आंदोलनामागे होती.या आंदोलनाला सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले.महाराष्ट्र सरकार ने यासाठी न्यायमूर्ती अनंता बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समिती नेमून सात महिने पूर्ण झाले असून अभ्यासाच्या नावावर महाराष्ट्र सरकार आरक्षण उपवर्गीकरनाबाबत वेळकाढूपणा करीत असल्याचे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सरकारवर रोष व्यक्त केला.सदर आंदोलनासाठी मातंग समाजाचे सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारमधील समाजाच्या लोकप्रतिनिधी नी जातीने लक्ष घालून आणि सरकारकडे पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक सत्रापासून उपवर्गीकरण लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला. आणि जर सरकारकडून याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये महायुती च्या उमेदवारांना मतदान करू नये अशीही भूमिका काही राज्यसमन्वयकांनी मांडली. अशी माहिती राज्यसमन्वयक डॉ.अंकुश गोतावळे यांनी दिली.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यसमन्वयक अशोक लोखंडे,राजाभाई सूर्यवंशी,पंडित सूर्यवंशी, बाबुराव मुखेडकर, एस एस धुपे,मारोती वाडेकर,कैलास डाखोरे, ऍड राम चव्हाण, सुरेश साळवे, रणधीर कांबळे, भास्कर नेटके, जोशीलाताई लोमटे यांनी प्रयत्न केले.
संघटनाप्रमुख विष्णु कसबे, सचिन साठे यांनी आपापल्या संघटनांचे राज्यस्तरीय मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावले. तर आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमदार सुनिल कांबळे, आमदार अमित गोरके, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंडारे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार नामदेव ससाणे,माजी आमदार राम गुंडीले, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार राजीव आवळे, रवींद्र दळवी, सुरेशचंद्र राजहंस, डॉ मिलिंद आव्हाड,परिमलदादा कांबळे,प्रा संजय गायकवाड ऍड रमेश शिंदे,गुलाब साठे, नाना शिंदे, ऍड पूजा देडे, ऍड टी एन कांबळे, विनोद जोगदंड आणि इतरही समाजातील अनेक संघटनाचे संघटनाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकार ने तेलंगणा राज्याचे अनुकरण करून तात्काळ उपवर्गीकरण लागू करावे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करावा – डॉ अंकुश गोतावळे (राज्यसमन्वयक सकल मातंग समाज)