पिडित आदिवासी महिलेला उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून पोलिसांनी रोखले
अत्याचाराचा खटला वापस घेण्यासाठी आरोपीकडून दबाव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील ३५ वर्षीय आदिवासी महिलेवर तेथीलच इसमाने अत्याचार केला व त्या अत्याचाराचा खटला मागे घेण्यासाठी येथील पाच आरोपी तिच्यावर दबाव आणून बदनामी करीत होते. याकरता भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहात भाजपा पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता पीडित महिलेने निवेदन देण्यासाठी गेली असता तिला पोलिसांनी रोखून धरल्याने त्या महिलेने अखेर रडत रडत न्यायासाठी मोठ्याने मागणी केल्याने सभागृहात सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले. प्रीती पुरुषोत्तम आत्राम वय ३५ वर्ष ही आदिवासी महिला खांबाळा येथे राहते. तिच्यावर येतीलच शेख इरफान शेख रसूल या इसमाने अत्याचार केला या घटनेची तक्रार ३१ ऑक्टोबर २०२२ ला करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करून काही दिवसातच त्याला जामीन मिळाला व हा खटला न्यायालयात सुरू आहे. या पीडित महिलेवर खटला मागे घेण्यासाठी वारंवार दबाव आणल्या जात आहे. परंतु पीडित महिलेने नकार दिल्याने या आरोपीने ही महिला दहा लाख रुपये मागत असल्या बाबत गावात तिची बदनामी करणे सुरू केले. दिनांक २२ जून ला या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी महिला त्या आरोपीकडे गेली असता यातील शेख इरफान, शेख रिजवान, शेख मोशीम, शेख दानीश, शेख मोहम्मद यांनी या महिलेचे कपडे फाडून मारहाण करून जखमी केले. त्या महिलेने वैद्यकीय उपचारानंतर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चावरे यांनी टाळाटाळ करून प्रकरण चौकशीत ठेवले यासाठी पोलीस अधीक्षक व आय जी यांची भेट घेतली. त्यानंतर सुद्धा सपोनि निलेश चावरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. इतर गुन्हे दाखल न करता त्याच्यावर विनयभंगाचा फक्त गुन्हा दाखल केला यातील पाचही आरोपी पोलिसांच्या मदतीने खटला मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास देत आहे. याकरता न्याय मिळावा असे या निवेदनात म्हटले आहे. ही महिला भद्रावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्याकरता आली होती. मात्र पोलिसांनी तिला भेटू न दिल्याने तिचे निवेदन हातातच राहिले. भद्रावतीच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जन माणसाच्या प्रश्नासाठी आमची दारे खुली राहील असे ते आपल्या भाषणात म्हणाले. या पिडित महिलेच्या अन्यायाकडे दुर्लक्ष केल्याने तिला न्याय मिळेल का असा प्रश्न या कार्यक्रमात उपस्थित सर्वच नागरिकांना पडला आहे. आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा. आदिवासी महिला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. त्याचा अहवाल सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. या विवाहित महिलेचे त्या आरोपी सोबत प्रेम संबंध होते. त्यातूनच हा वाद निर्माण झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आत्तापर्यंत तब्बल पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंदर्भात आता आय जी च्या आदेशानुसार चौकशी चालू आहे.