ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजात राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

देऊळगाव राजा- सिंदखेड राजा तालुक्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

            देऊळगाव राजा व सिंदखेडराजा दोन्ही तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊळगाव राजा च्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखाताई खेडेकर व कार्याध्यक्ष नरेश शेळके यांच्या नेतृत्वात स्थानिक बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात घोषणा देऊन प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.

      शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर लागू करून हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त यादीत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकर सरसकट मदत दिली जाणार आहे. मात्र देऊळगाव राजा व सिंदखेडराजासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त यादी समावेश करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर,नरेश शेळके,तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,गजानन चित्ते यांनी शासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला. दोन्ही तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस सापडला आहे.

पावसाळी सोयाबीन, मका, या पिकांचे उत्पन्नात मोठी घट झाली आहे. देऊळगाव राजा व सिंदखेडराजा या दोन्ही तालुक्यासह बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून वगळून शासनाने येथील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. सत्ताधाऱ्यांनी दोन्ही तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा अन्यथा आपल्या खुर्च्या खाली कराव्यात अशा स्वरूपाची तीव्र भावना रेखाताई खेडेकर यांनी मांडली. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीवर खर्च केला आहे आता घेतलेले कर्ज फेडायचे कसे या योजनेत शेतकरी सापडला आहे. दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळून येथील शेतकऱ्याची एक प्रकारे शासनाने थट्टा केली आहे. अशी भावना नरेश खेडेकर यांनी मांडली.

तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी बोलताना सांगितले की, दुष्काळग्रस्त यादीत दोन्ही तालुक्याचा समावेश करावा. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शासनाने आता त्याच्या पंचनामाच्या भानगडीत न पडता पीक नोंदीच्या आधारे सरसकट सोयाबीन उत्पादकांना मदत करावी. आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये व कपाशीला प्रतिक्विंटल 12 हजार रुपये भाव द्यावा.अशी मागणी केली.आंदोलनात जनार्धन मगर,जहीर पठाण, गजानन चित्ते,आजमत खान,विजय खांडेभराड,रावसाहेब गाडवे,शंकर वाघमारे,राजेंद्र अंभोरे,काँग्रेसचे गजानन काकड, विष्णू झोरे,गजानन तिडके,प्रा अशोक डोईफोडे,अमोल भट,ओमप्रकाश भुतेकर,शे. जावेद,मुबारक चाऊस,अरुण मोगल,असलम खान, राजू गव्हाणे,साजिद खान,शंकर लाड, अर्जुन लाड,समाधान चित्ते, भीमा लाड, तैसीफ खान,फिरोज खान, अयुब शाह यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये