ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलाम समाजाच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. सुभाष धोटे

भीमदेव मंदिर येथे कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

   जिवती तालुक्यातील मानिकगड पहाडावरील ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या पुरातन व प्राचीन भीमदेव मंदिर देवस्थान मानिकगड येथे आदीम कोलाम समाजाचा भव्य दसरा मेळावा संपन्न झाला, यावेळी मान्यवरांचे हस्ते भीमदेव मंदिरांची विधिवत पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक मुरुगानंथम, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रमुख पाहुणे अविनाश सेंबटवाड तहसीलदार, डॉ. भागवत रेजिवाड गटविकास अधिकारी, प्रा. सुग्रीव गोतावळे माजी सभापती, राजेश राठोड उपसरपंच ग्रामपंचायत खडकी रायपूर, सर्व सदस्य गण व ज्येष्ठ नागरिक नानाजी पाटील मडावी, मारू पाटील आत्राम, जालीम पाटील कोडापे, जयतु पाटील, पुजारी आयु पाटील कोडापे, मारू जंगू कुडापे, भीमा मुद्दा कोडापे, ग्रामसेवक विनोद शेरकी, पटवारी गोवर्धन, व तालुक्यातील बेचाळीस गुड्या वरील सर्व गाव पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील तरुण, युवक मंडळी मोठ्या उत्साहाने या मेळाव्यात सामील झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिम कोलाम बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुरेश कोडापे यांनी कोलामी भाषेत समाजाला मार्गदर्शन केले व स्थानिक समस्या मान्यवर मंडळीच्या पुढे सांगितल्या व त्या पूर्णत्वास नेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली.

या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, सर्व समाजांचा थोड्याफार प्रमाणात विकास झाला परंतु आदिवासी समाजामधील आदिम कोलाम बांधवांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही तेव्हा या समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. मी कोलाम समाजाच्या हितासाठी प्रयत्न करीत असून या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी, उत्थानासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. समाजाने केलेल्या विविध मागण्या आपण पुर्ण केल्या आहेत.

उर्वरित मागण्याही लवकरच पूर्ण करू, वन हक्कांचे पट्टे माझ्याच काळात मोठ्या प्रमाणात आदीम बांधवांना वाटप केले. त्यांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा व शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन उन्नती करावी असे विचार व्यक्त केले तर उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुरुगानंथम म्हणाले की, आदिवासी समाजातील आदिम कोलाम बांधवांनी इतर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावे व शिक्षणाकडे पूर्ण लक्ष देऊन प्रगती करावी, शासन तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु तुम्ही त्या प्रवाहात येत नाही अशी खंतही व्यक्त केली. सर्वांनी आता समोर येऊन आपल्या समस्या मागण्या ह्या मांडल्या पाहिजे तरच तुमच्या व्यथा आम्हाला, व्यवस्थेला व इतरांना कळेल व पुढच्या काळात अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यातून बनावे असे विचार त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन व कोलाम बांधवांचा इतिहास प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार राजेश राठोड यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव टेकाम, मारुती कोडापे,आनंद मडावी,पंकज कोडापे, लच्चू मडावी, माणिक कोडापे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला कोलाम समाज बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये