रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यातील माजरी येथील रेल्वे लाईन येथील रेल्वेचे इंजन वणी ते माजरी जंक्शनकडे जात असताना माजरी खदान रेल्वे स्टेशनच्या जवळ अप लाईनच्या मार्गावर पोल क्र.८४५ आर ३१ एन जवळ इंजनखाली उडी घेवून ईश्वर रविंद्र घागरगुंडे (२७) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना दि. २७ जुलै रोज शनिवारला दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, रेल्वेचे इंजन वणी ते माजरी जंक्शनकडे जात असताना माजरी खदान रेल्वेस्थानक पार केल्यानंतर पाचशे मीटर अंतरावर रेल्वे सायडींगवर एक युवक उभा असल्याचा इंजन ड्राइवरला दिसून आला. दरम्यान इंजन ड्राइवरने अनेकदा हॉर्न वाजविला.
मात्र सदर युवकाने इंजन जवळ येताच इंजनखाली उडी मारली. या घटनेत ईश्वर घागरगुंडे हा मृत्यूमुखी पडला. तो माजरी येथील सिद्धार्थ वार्ड परिसरात वास्तव्याला होता. तसेच तो वृत्तपत्र वाटपाचे काम करित होता, अशी माहिती प्राप्त झाली. आत्महत्येचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांनी ४५/२०२४ अन्वये मर्ग दाखल केला असुन पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.