महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यातूनच समाजाची खरी प्रगती : अजिंक्य भैय्या चांदणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- सकल मातंग समाज, जिवती तालुक्याच्या वतीने विश्वरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे तसेच प्रमुख व्याख्याते अजिंक्य भैय्या चांदणे (बीड) यांनी मिरवणुकीत सहभागी होत महापुरुषांना अभिवादन केले. पारंपरिक बँडच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर झेंडावंदन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉ. अंकुश गोतावळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत जी. एस. कांबळे (गडचांदूर) तर प्रमुख व्याख्याते म्हणून अजिंक्य भैय्या चांदणे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अजिंक्य भैय्या चांदणे म्हणाले, “महापुरुषांनी संकटांशी झुंज देत आणि प्रचंड हालअपेष्टा सहन करत इतिहास घडवला. त्यांच्या संघर्षातूनच समाज उभा राहिला. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाने वाटचाल करणे आवश्यक आहे. महापुरुषांचे विचार आत्मसात केले, तरच समाजाची खरी प्रगती होईल.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, “मातंग समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धारही चांदणे यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अंकुश गोतावळे यांनी “शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही,” असे स्पष्ट करत समाजातील युवकांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन केले. गरीबी दूर करण्यासाठी शिक्षण, संघटन आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मातंग समाजासाठी आरक्षणाचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले.
*कार्यक्रमात मातंग समाजातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
या जयंती उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये भानुदास जाधव, चरणदास केदासे, नवनाथ जांभळे, व्यंकटी कोटंबे, बाळू मस्के, पद्माकर पोतवळे, माऊली पवार, रविकांत कोमले, अंबादास कंसकटले, रमाकांत जगापल्ले, पंढरी वाघमारे, गजानन गायकवाड, दत्ता तोगरे, देविदास कांबळे, दिगंबर कलवले, मारोती मोरे, यादव भालेराव, नामदेव जाधव, शिवाजी शिव मोरे, शेषराव कांबळे, केरबा कोंबले, श्रीधर अर्जुने, विलास वाघमारे, बालाजी कोमले, माधव सागरे, गोविंद गायकांबळे, रंजीत सूर्यवंशी, लहु गोतावळे, पांडुरंग भालेराव, अनिल बसवंते यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास कंसकटले व देविदास कांबळे यांनी केले, तर आभार व्यंकटी कोटंबे यांनी मानले.



