गावात विद्यार्थी असूनही जिल्हा परिषद शाळा बंद
ग्रामस्थांचे शिक्षण विभागाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील नवेगाव (वाघाडे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थीसंख्या कमी झाल्याने काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. मात्र यावर्षी पहिल्या वर्गात प्रवेशासाठी चार विद्यार्थी पात्र असतानाही शाळा सुरू करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला जाब विचारत पंचायत समिती गोंडपिपरीचे गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळेत एकच विद्यार्थी उरल्याने त्याला शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देऊन शाळा बंद करण्यात आली होती. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असून लहान मुलांना दररोज प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
यावर्षी गावातील चार मुले पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असल्याने गावातच शाळा सुरू करून आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नवेगाव (वाघाडे) येथील जिल्हा परिषद शाळा सध्या ‘शून्य शिक्षक’ श्रेणीत असल्याने तातडीने सुरू करणे शक्य नाही. मात्र ग्रामस्थांच्या मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
*समाधान भसारकर, गटशिक्षणाधिकारी,गोंडपिपरी*
सगळीकडे शाळा सुरू झाल्या, पण शिक्षक नसल्याने आमच्या मुलाचा प्रवेश झाला नाही. आमची इतरत्र शिकवण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे गावातील शाळा तातडीने सुरू करावी.
*संदीप सरवर, पालक*



