ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संताजी जगनाडे महाराजांचे जीवन समाजप्रबोधनाचे प्रेरणास्थान – आ. किशोर जोरगेवार

संत शिरोमणी संताजी जगणाडे महाराज चंद्रपूर ते पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला समता, श्रमप्रतिष्ठा आणि मानवतेची शिकवण दिली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे जतन करून त्यांनी संत साहित्याच्या संवर्धनात मोलाचे योगदान दिले. त्यांचे जीवन आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून संताजी जगणाडे महाराजांचे जीवन समाजप्रबोधनाचे प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

समाजसेवक राजेश बेले यांच्या पुढाकारातून सकल तेली समाजाच्या वतीने पंच तेली हनुमान मंदिर येथे आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चंद्रपूर ते पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळा व सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी राजेश बेले, डॉ. संजय बेले, डॉ. नामदेव वर्भे, बलराम डोडाणी, निलेश बेलखेडे, रोहन घोंगडे, सोहम बुटले, नगरसेवक रवि लोणकर, वर्धन चौरे, गणेश येरणे, आकाश साखरकर, प्रशांत मुळे, अक्षय घटे, श्रुती घटे, मिनाश्री गुडेकर, सुवर्णा लोखंडे, चंदा इटनकर, पौर्णिमा मेहकुरे, अनिता निमगडे, अनिता वैरागडे, कल्पना महुलकर, कोकीला पोटदुखे, कविता झुमरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या संत परंपरेने समाजाला सदैव योग्य दिशा दिली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा यांच्यासह संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांनीही समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी भक्ती आणि मानवतेचा संदेश देत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले.

संताजी जगनाडे महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजातील सामान्य माणसाच्या जीवनाशी एकरूप होत त्यांनी समतेचा विचार रुजविला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे संकलन व जतन करून त्यांनी वारकरी साहित्य आणि संत परंपरेच्या जतनासाठी अमूल्य योगदान दिले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढत असलेला तणाव, मतभेद आणि स्वार्थीपणा दूर करण्यासाठी संतांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रेम, करुणा, समता आणि बंधुभावाचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारल्यास समाज अधिक सुदृढ आणि संस्कारक्षम बनेल, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये