चंद्रपूर-यवतमाळ रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी खा. धानोरकरांचा पुढाकार
नागपूर येथील बैठकीत अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ स्थानिक नागरिकांच्या रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्या आणि दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज स्वतः नागपूर येथे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने चिरादेवी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याबाबत चर्चा झाली, तसेच बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर ३ री व ४ थी रेल्वे लाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या प्रसंगी वरोरा शहरातील आनंदवन चौराहा आणि बोर्डा अंडरपास येथील रेल्वे अंडरब्रिजमध्ये पावसाळ्यात व इतर वेळी साचणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आग्रही मागणी करण्यात आली. तिथे दर्जेदार व आधुनिक ड्रेनेज सिस्टीम तसेच पुरेशी लाईट्स व्यवस्था करण्याबाबत रेल्वे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले. यासोबतच वणी आणि चिखलगाव येथे सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना होणारा नाहक त्रास थांबवून हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी आक्रमक मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लावून धरली. याशिवाय माजरी-भद्रावती रोडवरील रेल्वे गेट्स विनाकारण जास्त वेळ बंद न ठेवता केवळ रेल्वे वाहतुकीच्या प्रत्यक्ष वेळीच बंद ठेवावेत आणि प्रवाशांच्या कायमस्वरूपी सुविधेसाठी तिथे उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज मंजूर करावा, तसेच चिरादेवी ढोरवासा येथे अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असते. ते काढण्यासाठी उपाययोजना करा असा सूचना यावेळी करण्यात आल्या.
ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी कोरोना काळापासून माजरी रेल्वे स्टेशनवर बंद करण्यात आलेले ६ अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे तात्काळ पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यामध्ये प्रामुख्याने दक्षिण एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, बंगलोर एक्सप्रेस, जी.टी. एक्सप्रेस आणि काझीपेठ-अजनी पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. याचसोबत, १ जुलै २०२१ रोजी घुग्घुस येथे रेल्वेत कर्तव्यावर असताना दुर्दैवी अपघातात स्वतःचा पाय गमावलेले पॉइंट्समन राजू सदाशिव संगोजीवार यांना सध्या आमला स्टेशनवर पदस्थापना देण्यात आली आहे, परंतु त्यांच्या शारीरिक असमर्थतेमुळे त्यांना दैनंदिन प्रवासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, त्यांच्या मूळ गावानजीक म्हणजेच घुग्घुस, बल्लारशाह किंवा चंद्रपूर स्टेशनवर सोयीच्या ठिकाणी पुनर्वसन करून पदस्थापना देण्यात यावी, अशी मानवतावादी मागणीही खासदारांनी या बैठकीत लावून धरली.
चंद्रपूर-यवतमाळ-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवली असून सर्व प्रलंबित प्रस्तावांवर जलद कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेले रेल्वेचे महत्त्वाचे प्रश्न आता लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास या भागातील जनतेमधून व्यक्त केला जात आहे.



