ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन

चांदा ब्लास्ट

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, यजुर्वेद महाजन, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अम्मा की पढ़ाई फाउंडेशनचे चंदू वासाडे, नामदेव डाहुले, महामंत्री सविता दंढारे, रविंद्र गुरनुले, वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, आशा देशमुख, शीतल गुरनुले, नगरसेवक जितेश कुळमेथे, वंदना तिखे, अरुण तिखे, निलेश बेलखेडे, संजय बुरघाटे, सुमित बेले, प्रलय मशाखेत्री आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते, महाराष्ट्रियन ऑफ द इयर पुरस्कार 2025 सन्मानित तसेच राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समिती, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार यांचे सदस्य यजुर्वेद महाजन उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश मिळवण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. त्यासाठी जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवा, वेळेचे व्यवस्थापन शिका आणि अपयशाला घाबरू नका. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता आहे, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी हे केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे भविष्य आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव होताना पाहणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि संधी मिळावी यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा आणि चंद्रपूरचा झेंडा उंचावणाऱ्या डॉ. प्राजक्ता आस्वार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच डॉ. प्राजक्ता आस्वार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनामुळे नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी आणि पालकवर्गाची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये