ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी वरोऱ्यातील माजी सैनिक संघ, एअर बोर्न ट्रेनिंग सेंटर, स्व.मोरेश्वर टेमुर्डे ट्रस्ट, स्व. डॉ. विनायकराव वझे मेमोरियल, पैगाम साहित्य मंच, बेस्ट सिक्युरिटी एजन्सी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोऱ्याच्या संयुक्त विद्यमाने शहीद स्मारक येथे २४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर हे होते.
मंचावर सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, पूर्व सैनिक दिगांबर खापने, डॉ. भगवान गायकवाड, पैगाम साहित्य मंचाचे सचिव अशोक वर्मा, शहीद योगेश डाहुले यांचे आई आणि वडील प्रामुख्याने उपस्थित होते.
रमेश राजूरकर म्हणाले की,१९९९ च्या कारगिल युद्धात भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला पूर्णतः नेस्तनाबूत केले. कारगिल विजय दिवस हा दिवस भारतमातेच्या प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे प्रतीक आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याधिकारी भोयर म्हणाले की, सुमारे १६, ००० फुट उंचीवर, अत्यंत प्रतिकूल भूमीवर, खराब हवामानात, बर्फाच्छादित शिखराच्या तीव्र उतारावर लढल्या गेलेल्या या लडाखच्या कारगिल युद्धात भारतीय सशस्त्र सैन्याने चिकाटी व शौर्याने शत्रुचे मंसुबे नापाक केले. ते पुढे म्हणाले की, या कारगिल युद्धात अर्थात ‘ ऑपरेशन विजय ‘ मध्ये ५२७ भारतीय सैनिक शहीद झाले होते. कारगिल युद्धातील भारतीय सैन्य दलाच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास आदरांजली म्हणून ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो. कारगिल युद्ध ही भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना आहे.

यावेळी अन्य मान्यवरांचीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीला कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून शहीद स्मारक पासून नगर परिषद मार्गे सावरकर चौक, विठ्ठल मंदिर मार्गे डोंगरावर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शहीद स्मारक अशी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत शेकडोंच्या संख्येने विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, वरिष्ठ नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांचा समावेश होता. शहीद स्मारकावर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी माजी सैनिक संघाच्या वतीने जेष्ठ माजी सैनिक दिगांबर खापने, प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी गजानन भोयर, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. प्रभात फेरीत सहभागी झालेल्यां तर्फे ही शहीद स्मारकावर शहीद झालेल्या जवानांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहीद योगेश डाहुले याच्या आई वडीलाचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात दिगांबर खापने यांनी कारगिल युद्धाचा नेमका इतिहास व महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन माजी सैनिक वामन राजुरकर यांनी केले तर आभार माजी सैनिक सुरेश बोभाटा यांनी मानले.
कार्यक्रमात एअर बार्न ट्रेनिंग सेंटर, वरोरा अध्यक्ष अमन टेमुर्डे, सचिव – सागर कोहळे, रोटरी क्लब वरोरा अध्यक्ष डॉ.सागर वझे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश आगलावे, माजी सैनिक अनिल चौधरी, ऋषी मडावी, समाज कार्यकर्ता तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने, शाळेचे संचालक सुरेश मालू, पत्रकार बाळू भोयर, खेमचंद नेरकर,आकाश भोयर, सचिन बोधाने, शहरातील माजी सैनिक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये