मनरेगा अंतर्गत विहिरींचा निधी रखडला
लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा : मनरेगा अंतर्गत मंजूर सिंचन विहिरींचा निधी अद्याप मिळाला नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात पोंभूर्णा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, सन २०२३ ते २०२४ या कालावधीत मंजूर झालेल्या विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही संबंधित लाभार्थ्यांना अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधीअभावी शेतकऱ्यांनी कर्ज काढून काम पूर्ण केले असून, दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढून आत्महत्येचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सदर निवेदन श्री किशोर शालिक डाखरे (सामाजिक कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी) यांनी दिले असून, ते आष्टी, सोनापूर, चिंचखेडा (ता. पोंभूर्णा, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत.
तसेच, ०५ एप्रिल २०२६ पर्यंत निधी न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, डीआरडीए विभाग तसेच तहसीलदार पोंभूर्णा यांनाही देण्यात आल्या आहेत.



