आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. मुनगंटीवार यांचा यशस्वी पाठपुरावा

चांदा ब्लास्ट
अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंह यांचे आभार
चंद्रपूर :_ शेतकऱ्यांच्या अडचणींप्रती कायम संवेदनशील भूमिका घेणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कापूस खरेदीसाठीची अंतिम मुदत २७ फेब्रुवारीवरून १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीस उशीर झाल्याने एमएसपीचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना.गिरिराजजी सिंह यांच्याकडे पत्र व दूरध्वनीद्वारे केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून, याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे आभार मानले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच कापूस खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच भारतीय कपास निगम (सीसीआय) मुंबईचे चेअरमन श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याकडे केली होती. राज्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत ओलावा कायम राहिल्याने कापूस वेचणी व काढणीला मोठा विलंब झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत शेतकऱ्यांच्या घरी अद्याप कापूस पोहोचलेला नसल्याने एमएसपी अंतर्गत विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून समस्या मांडल्या होत्या. त्या निवेदनाची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवत तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजजी सिंह यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत मुदतवाढीची मागणी लावून धरली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर कापूस खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच, सीसीआयमार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. वाढीव मुदतीच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून एमएसपीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील व प्रभावी नेतृत्वामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.



