ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२० हजार रुपये प्रती हेक्टरी धानबोनस देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा

आ. सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट

आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला मंत्री ना. छगनजी भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद

वाढता उत्पादन खर्च आणि मजुरीच्या पार्श्वभूमीवर, धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याकडे आ. मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष

धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्यासंदर्भातील सखोल चर्चा

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याची आग्रही मागणी सरकारकडे केली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनजी भुजबळ यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढती मजुरी यांचा मुद्दा मांडला. धान उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रती हेक्टर २० हजार रुपये धानाचा बोनस देण्याची आग्रही मागणी त्यांनी बैठकीत केली.

त्याचबरोबर, २०२५-२६ च्या पणन हंगामात धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी त्यांनी केली. यामध्ये Beam पोर्टलवरील शेतकरी नोंदणीची प्रक्रिया, शेतकऱ्यांच्या नुकसानाचे व्यवस्थापन, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गरजा यासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ३९ केंद्रांवर ९१,६७१ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली असून, सद्यस्थितीत मंजूर असलेले ५.४७ लाख क्विंटलचे उद्दिष्ट संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक केंद्रांवर जवळपास २ ते ३ लाख क्विंटल धान ऑनलाईन एन्ट्रीअभावी उघड्यावर पडून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पीक पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात ८ ते १० लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज असून अद्याप वाढीव उद्दिष्ट मिळालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने किमान ३ लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करून पुढील कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी देखील आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

आ. मुनगंटीवार यांनी यावर्षीचे धानाचा बोनस देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची आवश्यकता मांडली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले. शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर विचार मंथन करत, त्यांच्यासाठी न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी सातत्याने लढण्याची आ. मुनगंटीवार यांची भूमिका आणि कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव तत्पर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांना १६२८ कोटी रुपये धानाचे बोनस मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे, चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यातही आ. मुनगंटीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील नेते म्हणून त्यांनी कायम पुढाकार घेतलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये