ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय पत्रकार संरक्षण समितीची स्थापना करा – त्र्यंबकेश्वर पत्रकार मारहाणीचा निषेध

व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी 

चांदा ब्लास्ट

    त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि चंद्रपूर जिल्हास्तरिय पत्रकार संरक्षण समितीची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांंचे निवेदन चंद्रपूर जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले. यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात व्हाॅईस ऑफ मिडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, सरकार्यवाह श्रीहरी सातपुते, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड, साप्ताहिक विंग जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष आशिष रैच, राजुरा तालुकाध्यक्ष गणेश बेले, मिलिंद गड्डमवार, बल्हारपूर तालुकाध्यक्ष शंकर महाकाली, प्रमोद गहलोद, भद्रावती तालुका सचिव रवी भोगे, रवी कडूदूला यांचा समावेश होता.

    दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्क्यांनी भीषण मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

       जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतांना म्हटले की, पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे.

     या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे आणि चंद्रपूर जिल्हास्तरिय पत्रकार संरक्षण समितीची स्थापना करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये