अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – कॅप्टन मोहन गुजरकर
जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘आदर्श नागरिक घडवायचे असेल तर तरुणाई पुढे सातत्याने चांगले विचार समोर ठेवणे गरजेचे आहे. अहिल्यादेवी होळकर या आदर्श शासक, अष्टपैलू संघटक व उत्कृष्ट योद्धा होत्या. आज समर्पित पिढी घडविण्याकरिता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी १ सप्टेंबर रोजी केले.
मंचावर अध्यक्षस्थानी राजमाता अहिल्याबाई होळकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राजू गोरडे तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर, प्राचार्य जयश्री कोडगिरवार समाजसेवक इमरान राही, सविता घोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर, अरुण लांबाडे व दिलीप उपासे उपस्थित होते.
सदर वकृत्व स्पर्धेचे आयोजन स्थानिक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाले असून यात अकरा कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 22 स्पर्धकांनी भाग घेतला.
सदर स्पर्धेत स्व. दिनकरराव मेघे स्मृतिप्रत्यर्थ डॉ. अभ्यूदय मेघे यांच्यातर्फे रुपये ५०००/-चा प्रथम पुरस्काराचा मानकरी बजाज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची अमृता माहुरे ठरली. स्व. अशोक मेश्राम स्मृती प्रित्यर्थ सविता घोडे यांच्याकडून रुपये ३००१/- चा द्वितीय पुरस्कार बजाज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा कौस्तुभ पाचाडे तर स्व. जगन्नाथराव ढांगे स्मृतिप्रत्यर्थ प्रकाशराव ढांगे यांच्यातर्फे रुपये 2001 चा तृतीय पुरस्कार देवळीच्या एस. एस.एन. जे. कनिष्ठ महाविद्यालयाची एनसीसी छात्र सैनिक कोमल शितळे यांनी पटकावला.
सदर स्पर्धेत आर. के. कनिष्ठ महाविद्यालय पुलगावची या शीला साऱीया, गो.से. वाणिज्य कनिष्ठ ज्ञमहाविद्यालयाची कू. पलक पत्रकार, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय आर्वी चा पूर्वेश केने व राधिका मोडक यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
सदर वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध शायर तथा कवी इमरान राही, समाजसेविका सविता घोडे व प्रा. रवींद्र गुजरकर यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राजू गोरडे यांनी प्रास्ताविक भाषण करून स्पर्धेची भूमिका समजावून सांगितली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य जयश्री कोडगिरवार म्हणाल्या वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे भाषण कौशल्य विकसित होते तर इमरान राही म्हणाले वकृत्व स्पर्धा म्हणजे बौद्धिक मेजवानीच होय.
कार्यक्रमाचे संचालन पदमाकर कांबळे यांनी तर आभार जितेंद्र गोरडे यांनी केले. यशस्वीते करिता नितीन सुळे, स्वाती गिरडकर व अहिल्यादेवी होळकर सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.