ताज्या घडामोडी

सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले – आ. किशोर जोरगेवार

बाबासाहेब वासाडे यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट

  सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले, सहकार व शिक्षण महर्षी बाबासाहेब वासाडे यांचे दुःखद निधन हे संपूर्ण समाजासाठी एक अपूरणीय नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले असल्याची प्रतिक्रिया आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

बाबासाहेब वासाडे यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सहकार क्षेत्राशी निगडित घटकांना नवी दिशा दिली. सहकार चळवळीचे महत्त्व आणि त्यातून होणारी सामाजिक-आर्थिक उन्नती याची जाणीव त्यांनी प्रत्येक गावागावांत पोहोचवली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून जिल्ह्यात सहकाराची मजबूत पायाभरणी झाली.

कॉलेज जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले. या दरम्यान ते युवक काँग्रेसचे अध्यक्षही झाले. ते शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय होते. शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी कॉलेज उभे करून त्यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक बदल घडवून आणले. ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ही वार्ता मनाला चटका लावून गेली. त्यांचे कार्य केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि समाजजागृती यामध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले आणि असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले.

आज त्यांच्या जाण्याने केवळ एक सहकार महर्षी हरपलेले नाहीत, तर संपूर्ण समाजाने एक मार्गदर्शक, एक दूरदर्शी नेता आणि एक समाजकारणी गमावला आहे. त्यांची पोकळी भरून निघणारी नाही.या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या अपार कार्यातून समाजाला नेहमी नवी प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये