ह्या मार्गावरील अतिक्रमणाला मनपाचे अभय का? – आयुक्त साहेब इकडेही द्या लक्ष
शहरातील हा मार्ग तरी वाचवा साहेब नागरिकांची मागणी - विद्यार्थ्यांनाही होतोय त्रास

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर
ऐतिहासिक चंद्रपूर शहराला मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचे ग्रहण लागले असुन शहरातील जवळपास प्रत्येक भागात अत्रिक्रमानाने विळखा घातला असुन नागरी अतिक्रमणाबरोबर व्यापारी अतिक्रमणांमुळे शहर बकाल दिसु लागले आहे. अतिक्रमणामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच मनपाच्या अगदी समोर असलेल्या गोल बाजार परिसरात चालणेही अवघड झाले असुन व्यापारी तसेच फेरीवाल्यांनी संपूर्ण रस्ताच गिळंकृत केला असुनही मनपा डोळे बंद करून सुस्तावत आहे.
शहराचे ऐतिहासिक प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या जटपुरा गेट परिसरातही सर्वत्र अतिक्रमण झाले असल्याने वाहतूकोंडी नित्याचीच झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या मगरमिठीत हरवले असल्याने पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.
ह्याच जटपुरा गेट मधुन आत येताच डाव्या बाजूने गोंड राजाचा काळातील रामाळा तलाव किल्ल्याच्या तटबंदीला लागून आहे. ह्या तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अतिक्रमणाने वेढा घातला असुन मनपाचे ह्याकडे असलेले सोईस्कर दुर्लक्ष शहराच्या सौंदर्याचा फज्जा उडवत आहे. पुरातत्व विभागाने चंद्रपूर शहरातील किल्ला ऐतिहासिक वारसा म्हणून नोंद केला असल्याने वाहतूकोंडी होत असूनही शहराचे वैभव असलेल्या जटपुरा गेट परिसरातून रस्ता रुंदीकरण शक्य होत नाही.
पुरातत्व विभागाच्या नियमामुळे अधिकृत भूखंड खरेदी करणाऱ्या नागरिकांना कायद्याची भीती दाखवुन बांधकाम परवाने देताना अनेक अटी लादण्यात येतात. बरेचदा परवानगी नाकारण्यात देखिल येते मात्र ह्याच मार्गावर थोडे पुढे गेल्यास अतिक्रमणाचा जबरदस्त विळखा अनुभवायला मिळतो. तटबंदीला लागूनच बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून काही लोकांनी घरे उभारली आहेत. काहींनी ह्यासाठी तटबंदी देखिल क्षतिग्रस्त केली. तर लगतच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वस्तीतील लोकांनी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण केले असुनही मनपा प्रशासन ह्याकडे अर्थपुर्ण डोळेझाक करत असल्याची चंद्रपूर वासियांची भावना झाली आहे.
ह्या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजुने लोकांना चालण्यासाठी किंवा वाहनाच्या पार्किंगसाठी लावलेल्या पेव्हर ब्लॉक (गट्टू) वर देखिल बांधकाम करून रस्ताच गिळंकृत करण्यात आला असूनही मनपा प्रशासन झोपेत आहे. ह्या मार्गावर काही ठिकाणी दुकानांनी, गॅरेजनी तर काही ठिकाणी चक्क पक्क्या घरांनी अतिक्रमण केले असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहे. ह्या परिसरात सकाळी व सायंकाळी नियमितपणे वृद्ध नागरिक फिरण्यास येतात त्यांनाही ह्या अतिक्रमणाचा त्रास होत असुन मनपा प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी करण्यात येत असुन यासंदर्भात काही नागरिकांनी ऑनलाईन तक्रारीही केल्या आहेत.