ग्रामीण भागाचे सर्वसमावेशक विकासाचे ध्येय गाठण्यासाठी विकासकामांबरोबर शिक्षण, आरोग्य सुविधांना केंद्रस्थानी ठेवा – आ. जोरगेवार
जिल्हा परिषद येथे बैठकीचे आयोजन, सर्व विभागांच्या कामांचा आढावा

चांदा ब्लास्ट
ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साधायचा असेल तर केवळ रस्ते, पूल, पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांवर भर देणे पुरेसे नाही, तर शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या गरजा समजून घेत त्यानुसार विकासाचे काम करा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेच्या बैठक सभागृहात सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भा.प्र.से., उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद जल्लेवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते, जिल्हा जलसंधारण अधिकारी संदीप खंबाईत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मगरोहमयो) उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक आशुतोष सपकाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रतिनिधी विशाल देशमुख, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मी कुमरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी कांचन वरठी, सहायक गटविकास अधिकारी (पंचायत विभाग) संजय नैताम, पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद रामटेक, बालविकास प्रकल्प अधिकारी आरती जगताप, उपअभियंता (तांत्रिक) निलेश मानकर, कृषी विभागाचे जयंत धात्रक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार, रंजन ठाकूर आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित आढावा बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व विभाग प्रमुखांसोबत जिल्ह्यातील विकास योजनांची सविस्तर चर्चा केली. आमदार जोरगेवार यांनी बैठकीत सांगितले की, गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शाळांमध्ये मूलभूत सुविधा, शिक्षकांची भरती, गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर प्राधान्य दिले पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी डॉक्टर, औषधे, उपचार सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
पांदण रस्त्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीच्या शिवारांपर्यंत जाण्यासाठी पांदण रस्त्यांची मोठी गरज असते. त्यामुळे अशा रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेगाने करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रलंबित रस्ते आणि पुलांच्या कामांची माहिती घेऊन त्याची प्रगती तातडीने करण्याचे निर्देश दिले. ग्रामविकास निधीचा योग्य वापर करून गावातील गरजांनुसार कामे हाती घ्या आणि त्यात पारदर्शकता ठेवा, अशीही सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.आपण विकासासाठी काम करतो आहोत, पण हा विकास केवळ आकड्यांमध्ये न राहता तो खऱ्या अर्थाने ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचायला हवा. गावातील प्रत्येक नागरिकाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा,” असे ते यावेळी म्हणाले.या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध योजनांच्या कामांची माहिती घेण्यात आली आणि अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना ठरवण्यात आल्या. या बैठकीला संबंधित विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.