निराधार योजनेचे लाभार्थी अडचणीत ; सात महिन्यांपासून अनुदान बंद
घुग्घुस काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : देशातील वृद्ध, दिव्यांग, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अक्षम नागरिक, तसेच विधवा व परित्यक्ता महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने 1980 साली सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू होती. मात्र, राज्य शासनाच्या नव्या ‘लाडकी बहिण योजना’ राबविल्यानंतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या सात महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उत्पन्नाचा दाखला आणि डिजिटल हयात प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना या प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने, वयोवृद्ध व अपंग नागरिकांना हे दस्तऐवज सादर करणे शक्य झालेले नाही. यामुळे जून महिना संपण्याच्या तोंडावर ही मुदत देखील संपत चालली असून, लाभार्थ्यांवर आर्थिक ताण वाढत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर घुग्घुस काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. डिजिटल हयात प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सात महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यामुळे अनेक वयोवृद्धांना दोन वेळचे जेवण मिळवणेही कठीण झाले आहे. या थकलेल्या नागरिकांना बँक आणि तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, त्यांना कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अत्यंत दुःखद आणि अमानवी आहे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी काँग्रेसचे नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सुनील पाटील, दिपक पेंदोर, तालुका सचिव विशाल मादर, एनएसयूआय अध्यक्ष आकाश चिलका, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, दिपक कांबळे, रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, सुमेश रंगारी, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
घुग्घुस काँग्रेसने शासनाकडे मानवी दृष्टीकोनातून या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे.