ब्रम्हपुरीत गोतस्करी करणाऱ्या आरोपींनी पत्रकाराला दिली मारण्याची धमकी, पोलिसांचा हलगर्जीपणा
गोतस्करीला आश्रय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गोतस्करीचा मोठा प्रश्न ब्रह्मपुरीत गंभीर स्वरूप धारण करत आहे. १९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय गेटसमोर जागृत नागरिक व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांनी अवैध जनावर वाहतुकीचा ट्रक अडवला व तातडीने प्रशासनास माहिती दिली.
सदर माहिती मिळताच पत्रकार राहुल श्रीराम भोयर यांनी घटनास्थळी पोहोचून पत्रकारितेच्या कर्तव्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. मात्र, त्या वेळी नागभीड येथील एका अनोळखी तस्कराने ‘बे कायको व्हिडिओ बना रहा बे, बंद कर… तुम जैसे पत्रकार बहुत देखे’ अशा अपमानास्पद, अश्लील व धमकीवजा भाषेत बोलत, त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. काही वेळ मोबाईल ताब्यात ठेवत, पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर सरळ हल्ला असून पत्रकार संरक्षण कायदा २०२३ आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा आहे.
या घटनेची माहिती घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस ठाणेदारांना देण्यात आली. त्यांनी ‘एफआयआर नोंदवतो’ असे आश्वासन दिले; परंतु घटनास्थळीच किंवा लगेच कोणतीही कारवाई केली गेली नाही, हे विशेष. एवढेच नव्हे, तर आरोपी इसम पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असताना देखील त्याचे नाव विचारून त्याच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल केला गेला नाही.
सदर घटनेनंतर ब्रह्मपुरीतील पत्रकारांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले व पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पत्रकारांनी चर्चा करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांना बोलावले असता त्यांनी ‘माझी तब्येत बरी नाही’ असे सांगून चर्चा टाळली; मात्र त्याच वेळी एका राजकीय नेत्यासोबत केबिनमध्ये बंद दाराआड चर्चेत ते स्वस्थ दिसले. हा दुजाभाव आणि पत्रकारांना डावलण्याची वृत्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
शहरातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक यांच्या वर्तनाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दोन ट्रक पकडण्यात आले असून ट्रकमधील जनावरे गोविंदपूर येथील गोशाळेत सोडण्यात आली आहेत. मात्र पोलिसांनी पाच तास विलंब करून कारवाई केल्याने, ट्रकमध्ये गुदमरून जनावरांना काही हानी पोहोचली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि दुर्लक्षाचा प्रकार स्पष्ट दिसून येतो.
ब्रह्मपुरीतील पत्रकारांच्या एकतेमुळे हा प्रकार बाहेर आला असून, पत्रकारांसोबतच समाजातील जागृत घटकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या गोतस्करीला थारा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आज राज्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा अपेक्षित असताना, गोतस्करी करणाऱ्यांना अभय मिळत असेल, तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा अपमान आहे. प्रशासनाने तत्काळ कर्तव्यदक्षता दाखवत अशा तस्करांविरोधात कठोर कारवाई करावी आणि पोलिसांवरील लोकांचा विश्वास पुनःस्थापित करावा, अशी मागणी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत नागरिकांकडून केली जात आहे.