विद्यार्थी पूर्ण होण्यास पालक व शिक्षक या नाण्याच्या दोन्ही बाजूंची गरज – रवींद्र मूप्पावार
पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघाच्या उपस्थितीत शैक्षणिक सत्र २०२३ -२४ ची पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थी पूर्ण होण्यास पालक व शिक्षक या नाण्याच्या दोन्ही बाजूची गरज असते,दोन्ही बाजूंनी समान पोषक वातावरण जर विद्यार्थ्यांना मिळत असेल तर त्याला यशाचे शिखर गाठणे सोपे जाते असे सभेला मार्गदर्शन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मूप्पावार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सुनिल बोमनवर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र आडेपवार,खुशाल राऊत,सुरेश करोडकर,विद्यालयाचे शिक्षक मिलिंद सूपले,सुधाकर मेश्राम, रेवताताई मडावी,पालक संघाचे सचिव सुधीर जीवतोडे उपस्थित होते.
सभेमध्ये वर्षभरामध्ये शाळेमध्ये चालणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच शिक्षक आणि पालकांमध्ये साधक-बाधक चर्चा करण्यात आली.यावेळी पालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले. पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
सदर सभेचे संचालन प्रदीप कोहळे यांनी केले तर आभार राजू केदार यांनी मानले.सभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.