सामाजिक बळ स्त्रियांना अधिक सक्षम बनवू शकते – स्मिता चिताडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर च्या वतीने निमणी या गावांमध्ये सात दिवसीय विशेष रा. से. यो.शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महिला सक्षमीकरणावर परिसंवादा साठी सौ. स्मिता चिताडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांचे सक्षमीकरण कसे करता येईल या संदर्भात सखोल मार्गदर्शन गावातील समस्त महिलांना केले.
या कार्यक्रमांमध्ये शिबिरार्थी विद्यार्थिनी, निमनी गावातील शिक्षण घेणाऱ्या मुली, शेतावर जाणाऱ्या महिला व घरकाम करणाऱ्या स्त्रिया या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आपण आर्थिक बाबतीत काही प्रमाणात सक्षम झालो असलो तरी अजूनही आपल्याला समाजात मानाचे स्थान पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही, असे परखड व्यक्तव्य सौ. चिताडे मॅडम यांनी आपल्या भाषणातून मांडले. स्त्रियांनी शिकणे ही आजच्या काळाची गरज आहे, त्याबरोबरच त्यांना सामाजिक जाणीव करून देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. अलीकडे मोबाईलचा वापर आपल्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक कार्यासाठी केल्यास मोबाईल हे वरदान ठरवू शकते मात्र पाहण्यात असे आलेले आहे की मोबाईलचा वापर हा टाइमपास म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो व नको त्या साईट्स आपल्या पाहण्यामध्ये येत असल्यामुळे सामाजिक अस्थिरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसत आहे. आपण वेळीच सावध न झाल्यास येणाऱ्या पिढीवर याचा फार मोठा गंभीर परिणाम झालेला आपल्याला दिसेल. त्यामुळे आपल्या मुलांसाठी प्रत्येक स्त्रीने एक तास जरी काढला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद केला पाहिजे.
तेव्हाच आपण त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सक्षम करू शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव सर यांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले. यावेळी कोंगरे, मुख्याध्यापक यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केलेत.कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गावातील महिला पुरुष, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भाग घेऊन सहकार्य केले.