बीड सरपंच हत्या प्रकरणी सरपंच परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
हत्याऱ्याला फाशीची शिक्षा द्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक करुन फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता सरपंच परिषद, मुंबईच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्हा समन्वयक आशिष देरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना बुधवारी निवेदन दिले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या प्रकरणातून खंडणीखोरांनी अतिशय निर्घुणपणे हत्या केली. ही मानवी प्रवृत्तीला काळीमा फासणारी घटना आहे. २३ दिवस होऊनही या हत्येतील सर्व आरोपींना अटक झालेली नाहीत. संतोष देशमुख यांची हत्या ही पोलिस कर्मचारी व खंडणीखोर यांनी मिळून केली असल्यामुळे या प्रकरणी ३ तास उशीरा फिर्याद घेतलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी परिषदेने केली आहे. मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीमार्फत जलदगतीने व्हावा, या गुन्ह्याच्या प्रमुख सुत्रधारावर देखील खुनाचे गुन्हे दाखल करावे, अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींप्रमाणेच सरपंचांनाही संरक्षण कायदा लागू करावा, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे केज पोलिस प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे झाली. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नौकरी देण्यात यावी, तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत देशमुख कुटूंब व मस्साजोग पवनचक्की ऑफीसमधील सर्व सुरक्षारक्षकांना देखील पोलिस संरक्षण द्यावे.
यासह इतरही मागण्या असून मागण्या मान्य कराव्या अन्यथा सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, राजू पोतनीस, संजय जगदाळे, आशिष देरकर, दीपक खेकारे, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे यांनी दिला आहे.