पुनर्वसनसाठी राखीव जागेवर बस आगार उभारा
सर्वदृष्ट्या होईल सोईस्कर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – तालुक्यातील तुकडोजी नगर जवळ कोडशी बूज या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. परंतु अनेक वर्ष लोटून ही येथे कोणीच वास्तव्यास आले नाही. त्यामुळे ही जागा एसटी आगार साठी देऊन नव्या आगाराची स्थापना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राजूरा,कोरपना, जिवती तालुका मिळून एकच राजूरा येथे आगार आहे. त्यामुळे सर्व बस फेर्याचे नियोजन तिथूनच होते. मात्र राजुरा वरून कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावाचे अंतर अधिक आहे. त्यामुळे वेळेवर बससेवा उपलब्ध होत नाही. तसेच आगाराच्या कार्यक्षेत्रात गावांची संख्या अधिक असल्याने या दोन तालुक्यातील बऱ्याच गावात बस सेवा सोडण्यात अडचणी येतात. कोरपना येथे बस आगाराची निर्मिती झाल्यास ही अडचण दूर होईल. तसेच बस बाबत होणारी बोंबाबोंब ही थांबेल. कोरपना हे मध्यवर्ती व तालुक्याचे स्थान असल्याने येथील जिवती, गडचांदूर, पारडी, वणी बूज, येल्लापुर गावाचा परिसर, चौदा वादग्रस्त गावे, तेलंगणा राज्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील गावांना बस फेयाचे नियोजन करणे वेळेत सोयीचे होईल. या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने योग्य समन्वय साधून यावर लक्ष देणे अपेक्षित आहे.
जागेचा दुसराही पर्याय
कोरपना येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार स्थापन करण्यासाठी तुकडोजी नगर येथील कोडशी बूज गाव पुनर्वसन राखीव जागेसह कातलाबोडी जवळील कातलाबोडी – बोरगाव रस्त्यादरम्यानची शासकीय गायरान जागा उपलब्ध आहे. हे स्थळ देखील एस टी आगार साठी योग्य आहे. त्यामुळे यावर गांभीर्याने राज्य परिवहन महामंडळाने आत्ताच लक्ष देणे अपेक्षित आहे.