सचिवांच्या मनमानी कारभारामुळे गावाचा विकास खुंटला
ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : तेलंगणा सीमेलगत असलेल्या येल्लापुर ग्राम पंचायतच्या दि.१२ सप्टेंबर २०२४ ला झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यानी सचिवाच्या मनमानी कारभाराला त्रासून ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे गाव विकासाला खीळ बसल्याने तत्काळ बदली करून गावातील समस्या दूर करण्याबाबतचा अर्ज ग्रामसेभेतच सर्वांसमक्ष सह्या करून दिला होता. तो अर्ज वेळेवर आल्याचे कारण सांगुन ग्रामसभेत स्विकारला नसल्याने तोच अर्ज २६ सप्टेंबरला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी गटविविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिला. तेंव्हापासून येल्लापुर येथील ग्रामसेविका यांनी गावातील अर्धवट ज्ञान असणाऱ्या काही लोकांना हाताशी धरून गावातील भाबड्या लोकांना भडकाऊ संभाषण करून लोकांच्या मनात अर्ज देणाऱ्या ग्रा.पं.पदाधिकारी व नागरिकांविषयी संभ्रम निर्माण केला. तसेच गावात चुकीची व खोटी माहिती पसरवून गावात वाद लावण्याचे काम करून गावातील शांतता भंग करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
ग्रामसेविका एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या दोन सुशिक्षित युवकांची पोलिसात तोंडी तक्रारही केली. यासंबंधी व्हिडिओ व दुसरे पुरावे उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद आहे. ग्रामवेविका ग्रा.पं.ला हप्त्याने एक ते दोनच दिवसच येतात. त्यामुळे कामासाठी ग्रा.पं.मध्ये गर्दी होते. गावातील समस्येविषयी बोलायला गेलेल्यांना ग्रामसेविका अरेरावीची भाषा तर वापरतात तसेच ग्रा.पं. सदस्यांनासुद्धा अरेरावीची भाषा वापरतात. ग्रामसेविका यांनी केलेली चुकीची कामे उघडकीस आल्यामुळे सचिवांनी काही अर्धवट ज्ञान असणाऱ्यांना सोबत घेऊन ग्रा.पं.च्या कामकाजात हस्तक्षेप वाढवुन गावातील शांतता भंग करीत असल्याचा आरोप ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना परत ०३ ऑक्टोंबर ला दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. तसेच या गंभीर बाबीची तत्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करून गावात शांतता प्रस्थापित करावी. अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना ग्रामपंचायत सरपंच, सुमित्रा मेश्राम, उपसरपंच रंजीता जीवने, सदस्य सोनराव पेंदोर, सदस्य प्रशांत कांबळे, कल्याण सरोदे यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.