अरोविंदो कंपनीची रस्ता वळतीकरण कार्यवाही त्वरीत थांबवा – हंसराज अहीर
ग्रामस्थ व प्रबंधनाची बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
चांदा ब्लास्ट
अरोविंदो कंपनी प्रबंधनाकडून टाकळी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव व या विषयीच्या अटीशर्तीचे उल्लंघन करीत किलोनी-बेलोरा जेना रस्ता वळविण्याची कार्यवाही होत असल्यांने ही कार्यवाही त्वरीत थांबविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विपीन गौडा, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी श्री नैताम यांचेसोबत तातडीची बैठक घेवून जन असंतोषाच्या पार्श्वभूमीवर अरोविंदो प्रबंधनाकडून होत असलेल्या या रस्ता वळतीकरणास त्वरीत प्रतिबंध घालावे अशा सुचना उपस्थित अधिकाऱ्याऱ्यांना दिल्या. या रस्ता वळतीकरणास कोणत्या आधारावर परवानगी दिली? अशी पृच्छा करून अहीर यांनी शेतजमिनी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नसतांना वळतीकरणास परवानगी देणे योग्य नसल्याचे सांगत ही परवानगी अटीशर्ती नुसारच द्यायला पाहिजे होती असेही अहीर यांनी अधि काऱ्यांना सुनावले.
किलोनी, बेलोरा, जेना व टाकळी येथील अरोविंदो कंपनी प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांच्या संतप्त भावनांची दखल घेवून कंपनी प्रबंधन व ग्रामस्थांची त्वरीत संयुक्त बैठक बोलावून तत्पूर्वी रस्ता वळतीकरणास दिलेली परवानगी रद्द करावी असेही अहीर यांनी अधिकाऱ्याऱ्यांना निर्देशित केले.