आदर्श नागरिक मारोतराव मगरे यांचे मरणोत्तर देहदान
देहदान करून मगरे यांनी घालून दिला माणुसकीचा नवा पायंडा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
राजेंद्र मर्दाने, वरोरा
वरोरा येथील स्नेहनगर अभ्यंकर वार्डातील रहिवासी, सामाजिक बांधीलकी जपणारे कर्मयोगी, जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, शाखा- वरोरा चे सचिव मारोतराव मगरे (७२) यांचे रविवारी हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा – मुलगी, सून – जावई, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. निधनानंतर कोणताही सोपस्कार न करता विपीन मगरे यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार देहदान दिल्याने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. नरदेहाच्या सुक्ष्म अभ्यासासाठी त्यांचा देह चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आला.
मारोतराव मगरे हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिसरातील परिचित व्यक्तिमत्त्व. शबरी आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली येथून व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वःताला पूर्णपणे समाजकार्यात गुंतवून ठेवले. ज्येष्ठ नागरिक संघ सचिव पदाची धूरा त्यांनी समर्थपणे पेलली. मुला- मुलींचे लग्न पार पाडून सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. एका मुलीचा अकस्मात मृत्यू तद्नंतर पत्नीचाही मृत्यू या दोन घटनांचा आघात त्यांना सहन करावा लागला. काही वर्षांपूर्वी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्याची एंजिवोग्राफी सुद्धा झाली. तरी ते खचले नाहीत. यातून स्वतःला सावरत हिंमतीने पुढे सरसावले. सार्वजनिक कार्यक्रम असो की कुणाचा सुख दुःखाचा प्रसंग असो, तिथे त्यांची हजेरी दिसायची. लोकांच्या सुख दुःखाशी समरस होऊन ” हॅप्पी थॉट ” विचाराचा प्रचार प्रसार ते करीत असत. समाजातील एकूण परिस्थिती बघता मारोतराव मगरे यांनी जिवंतपणी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. हे विशेष. घरच्या मंडळींनीही त्याला विरोध केला नाही.२५ मे २०२५ रोजी मारोतराव मगरे यांचे आकस्मिक निधन झाले. जवळच्या नात्यातील व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार करताना कुटुंबातील व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात.परंतु, मगरे कुटुंबियांनी जुन्या रुढी परंपरा आणि कर्मकांडाला फाटा देत निधन झालेल्या व्यक्तीच्या इच्छेनुसार मृत्यू नंतरची देहदानाची प्रकिया पूर्ण करीत “मरावे परी कीर्तिरूपे उरावे” ही म्हण सार्थ ठरवत समाजाला माणुसकीचा नवा पायंडा घालून दिला आहे.
देहदानापूर्वी त्यांचे राहते घरी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि वरोरा तालुक्यातील हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. तद्नंतर त्यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी लक्ष्मणराव पराते, वि. गो. सोनेकर, चिवंडे सर, माना समाजाचे नेते अधिवक्ता नारायण जांभुळे, राजू दोडके, प्रमोद मगरे, अधिकारी शरद नन्नावरे, रमेश दडमल, अनिल चौधरी, भाजपा नेता डॉ. रमेश राजूरकर, न.प. माजी सभापती आणि काँग्रेस नेते छोटुभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते, नितीन नक्षिणे, माजी प्राचार्य बी. आर. शेलवटकर, डॉ. अमोल कातकर, जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आर.जी. मर्दाने, गणमान्य शिक्षक, शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “अमर रहे – अमर रहे, मारोतराव मगरे अमर रहे”, जयघोष करीत मारोतरावजी मगरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
जय हिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पंजाबराव मुधाने यांनी मारोतराव मगरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांचे राष्ट्राबद्दल असलेले बहुमूल्य योगदान लक्षात घेता देशातील सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना तीन दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश निर्गमित केले आहे.