Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय क्रीडा स्पर्धेत शाळा / महाविद्यालयांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन,खेळ व खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देत आहे. याच अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित होणा-या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील शाळा / महाविद्यालयांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी केले.

वीस कलमी सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्य, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, मनपाचे नागेश ज्योत उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावे, याकरीता शाळा, महाविद्यालय व इतर संस्थांनी क्रीडा क्षेत्रात व्यापक सहभाग वाढवावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू, शाळा, महाविद्यालयांनी पावसाळी क्रीडा स्पर्धेत भाग घ्यावा. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी पत्र लिहून सदर स्पर्धेत भाग घेण्याचे अनिवार्य करावे, अशा सुचना दिल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांची आयोजन व नियोजन करण्याची जबाबदारी क्रीडा संचालनालयामार्फत सोपविण्यात येते. त्यानुसार तालुका स्तरावरील विजयी खेळाडू जिल्हा स्तरावर सहभागी होतो. शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू कसे सहभागी होतील, यावर विशेष चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये