तालुक्यातील हजारो हेक्टर पिके पाण्याखाली शेतकरी हवालदिल
चांदा ब्लास्ट
गेल्या तीन दिवसांपासुन सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुल व चिमढा नदीला महापुर आल्याने मुल, सावली या दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील धान पीक व कापुस पीक बुडाले. यामध्ये शेतक-यांचे फार मोठे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत चार दिवसांपासुन शेतात पाणी तुडूंब भरल्याने धान पीक आवत्या पेरणी व प-हे पुर्ण वाया गेले आहे. दुबार पेरणीची वेळ आली आहे. तसेच शेतातील धान गाटे फुटून संपुर्ण शेतात माती पसरलेली असल्याने शेतक-यांची दुहेरी नुकसान झालेले आहे.
सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असुन त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उमा नदी आणि नाले दुथडी भरुन वाहु लागले आहे. नदीचे आणि पावसाचे पाण्यामुळे तालुक्यातील धान शेती पाण्याखाली आली. उमा, अंधारी नदीच्या काठावरील धान उत्पादक शेतक-यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. पुराचे पाणी शेत बांध्यामध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. उमा नदी आणि अंधारी नदीच्या पुलावरुन पाणी असल्याने मुल वरुन जाणारे मार्ग बंद झाले आहे. चंद्रपुर, सावली, गडचिरोली या मुख्य मार्गासह ग्रामीण भागातील मार्ग बंद झाले आहे. सर्वत्र आलेल्या पुरसदृश्य परिस्थीतीमुळे तालुक्यात चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. उमा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने संततधार पावसामुळे धान उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ज्या ठिकाणी रोवणी झाली, त्या ठिकाणचे धान रोपे वाहुन गेले, धान आवत्या पीक खराब झाले वाहुन गेले व धान गाटे फुटून शेतात माती पसरली असल्याचे प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांसमक्ष पंचनामे करावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
मुल तालुक्यातील भादुर्णी, उसराला, रत्नापुर, राजोली, चिखली, डोंगरगांव, म-हेगांव, टेकाडी, आकापुर, मोरवाही, मुल अंतरगांव, पारडवाही, ताडाळा, चिंचाळा, हळदी, भेजगांव, नागाळा, चिचपल्ली, बोरचांदी, विरई, फिस्कुटी, येरगांव, नवेगांव भुजला, चुरूड तुकुम आणि सभोवतालचे अनेक गांवे वैनगंगा नदीच्या पुराने बाधित झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील अनेक गांवातील शेती पाण्याखाली आली आहे. तसेच सावली तालुक्यातील सावली अनेक गांवे, कुक्कुड चिमढा, खेडी येथील शेकडो हेक्टर शेती अजुनही पाण्याखाली आहे. धान पीक पेरणी पुर्ण वाया गेली आहे.
चिखली शिवारातील शेतातील पाईप, शेती अवजारे, पुराने वाहून गेले आहे. येरगांव येथील शेतकरी संजय फुलझेले यांचे शेतातील मोटार पंप, पाईप, नांगर, वखर, शेती अवजारे वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. बोरचांदली येथील तीन शेतक-यांच्या शेतातील शेकडो खताच्या बॅग पाण्याने खराब झाल्या. अजुनही पुर परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.
अशा प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या कृषी विभागाने, महसुल विभागाने प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांधावर जावुन शेतक-यांसमक्ष पाहणी करुन सर्व्हे करावे व पंचनामा करावा, नुकसानग्रस्तांना विश्वासात घ्यावे व पीक परिस्थीतीचा, शेती नुकसानीचा अचुक अहवाल शासनाकडे त्वरीत सादर करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच दुबार पेरणीसाठी व संपुर्ण येणा-या खर्चासाठी शासनाने शेतक-यांना मदत द्यावी
ब्रम्हपुरी गडचिरोली, चामोर्शी वाहतुक सुरू झालेली नाही. आजही किरकोळ स्वरूपाचा पाऊस पहाटे पासून सारखा सुरूच आहे. एकंदरीत मुल, सावली तालुका पुर्ण दुष्काळात सापडला असून दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे.
दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, खते, तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यानी केली आहे. पीक विम्याचे पैसे त्वरीत मंजूर करावे. यावर्षी चालू हंगामात शेतक-यायंनी खरीप पिकाचा प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषि मंत्रालय यायंचेकडून हंगाम सुरू होताच अनेक शेतक-यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढला आहे. आणि लगेच पेरणी व रोवणी, आवत्या पेरल्याने संपुर्ण पीक पुरात वाहून गेले आहे. शेतकरी हवालदिल, कर्जबाजारी झाला आहे. करीता शासनाने संबंधित विमा कंपनीकडून शेतक-यांनी काढलेल्या विम्याचे पैसे त्वरीत मंजूर करावे, प्रसंगी दुष्काळ जाहीर करून शेतक-यांचे कर्जमाफ करावे, अशी मागणी सि.डी.सी.सी. बॅकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.