महाराष्ट्र शासनाच्या गाडीतूनच अवैध रेती तस्करी ?
भद्रावती तालुक्यातील अवैध रेती तस्करीबाबत शिवसेनेची कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात अवैध रित्या सुरू असलेली रेती तस्करी दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून प्रशासनाचे दुर्लक्ष या प्रकारास खतपाणी घालत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात शिवसेना नेते सुरज भाऊ शहा यांचा नेतृत्वात आज भद्रावती तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.
नुकत्याच घडलेल्या प्रकारात, महाराष्ट्र शासनाची अधिकृत गाडी वापरूनच रेती तस्करी करण्यात आली, ही बाब अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे त्या गाडीचा पंचनामा झाल्यानंतर ती रातोरात गायब झाल्याचेही समोर आले आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद असून, प्रशासनातील काहींच्या संमतीशिवाय असा प्रकार घडणे शक्य नाही, असा आरोप सुरज शहा यांनी केला आहे.
शासनाची गाडी तस्करीसाठी वापरण्यात येते आणि त्यानंतर ती गायब होते, हे नेमकं कसे शक्य आहे? असा थेट सवाल त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी स्पष्ट मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबतच भद्रावती तालुक्यात सुरू असलेल्या सर्व अवैध रेती तस्करीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची, आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.
शिवसेना पक्ष या विषयाकडे गांभीर्याने पाहत असून, जर वेळेत कार्यवाही झाली नाही तर पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसैनिक सुरज शहा, शिवसेना उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक सुमित हस्तक, दीप गारघाटे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.