चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी
शेती व पिकाचे नुकसान ; नुकसान भरपाईची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कोरपना – राजूरा ते राज्य सीमा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम सुरू आहे. याच दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाची नव्याने निर्मिती करण्यात येत आहे. परंतु या कामाचे नियोजनात्मक पद्धतीने काम होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले जात आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या शेती व शेत पिकाचे मोठे नुकसान होते आहे.
कोरपना शहरालगत धोपटाला फाट्यालगत नाला आहे. या नाल्यावर पुलाचे काम सद्यस्थितीत मोठ्या वेगाने सुरू आहे. रहदारीसाठी रस्ता सुरू राहावा. यासाठी बाजूलाच पर्यातमक रापट तयार करून रस्ता तयार करण्यात आला. परंतु या रापट मध्ये एक ते दोनच पाईप टाकण्यात आले. परिणामी नाल्याचे पाणी चोकअप झाले. त्याचे संपूर्ण पाणी रापट वरून वाहून मार्ग बंद झाला.तसेच आजूबाजूच्या शेतात साचले गेले. या संबंधाने यापूर्वीच नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्याला असा धोका होऊ शकते म्हणून पूर्व सूचना सुद्धा दिली. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारे पाहिजे तशी उपाययोजना करण्यात आली नाही. दीड महिन्यापूर्वी याच नाल्यावरील हे संपूर्ण रापट वाहून गेले होते. परिणामी राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडला. त्यावरून काही बोध न घेता पुन्हा तात्पुरते रपट टाकण्यात आले. याचा फटका पुन्हा सोमवारी झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बसला. अशीच स्थिती राष्ट्रीय महामार्ग लगत अन्य स्थळी सुद्धा होत आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गाचे काम असलेल्या जीआर इन्फ्रा कंपनीला त्याशी काही देणे घेणेच नाही. अशा पद्धतीने चुकीच्या स्वरूपात कामे सुरू आहे. यावर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येते.