ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष लेख : फादर्स डे च्या निमित्ताने न उमगलेला बाप…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

     बाप हा विषय आपल्यासाठी ब-यापैकी दुर्लक्षितच असलेला विषय.आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व.पण या घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आपण समजून घेतलं आहे का.?बापाला महत्त्व असूनही त्याच्याविषयी जास्त बोललं जात नाही.संत महात्म्यांनी सुद्धा आईचेच महत्व सांगितलेले आहे.देवांनी सुद्धा आईची तोंडभरून स्तुती केलेली आहे.चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते,पण बापाविषयी मात्र कुठेच बोलले जात नाही.काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही खूप तापट,व्यसनी, मारझोड करणारा.समाजात एक-दोन टक्के बाप तसे असतीलही पण चांगल्या बापाबद्दल काय..?

     आईकडे अश्रूचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात.आई रडून मोकळी होते, पण सांत्वन करायला मात्र बापच लागतो.आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो.रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते,पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आमच्या कधीच लक्षात राहत नाही.निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती प्रेमाने जवळ घेते म्हणून,पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही.आईला वाटलं तेव्हा ती मन मोकळं करून रडते पण बापाला मात्र रडता येत नाही.स्वतःचा बाप मेला तरी त्याला अश्रू डोळ्यातच ठेवावे लागतात कारण त्याच्यावर जबाबदा-या असतात म्हणून बाप माणसाला सुद्धा काही भावना असतात त्यालाही आपल्याशी बोलायचं असतं हे आपण सोयीस्करपणे विसरतो.आपण आपल्या वडिलांसोबत कितीदा मनमोकळ्या गप्पा मारल्यात, आपल्यापैकी कोणालातरी आठवते का?बापाचं महत्त्व काय असते हे मुलं कधीच समजू शकत नाही.काही मुले समजून सुद्धा घेत असतीलही पण तेही अगदी बोटावर मोजण्याइतकेच.

      ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमत सुद्धा होत नाही.कारण घरातला कर्ता माणूस म्हणजेच बाप जिवंत असतो.मुलगा त्याची कर्तव्य विसरू शकतो, पण बापाला बाप होणं कधीच टाळता येत नाही.आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.प्रत्येक मुलाला बापाचं अस्तित्व जाणवायला हवं त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व अपूर्ण आहे अशी जाणीव व्हायला हवी.

    आपल्याला जर उशीर झाला तर रागावणारा बाप आपल्याला दिसतो पण त्या रागावण्यामागची काळजी मात्र कुणालाच दिसत नाही,का बरं असं होत असेल याचा विचार एकदा तरी नक्कीच करायला हवा..?

  बाप जिवंत असताना त्याची किंमत कळायला हवी.बाप नावाच्या माणसाचा आपल्याला किती आधार असतो हे बाप गेल्यावर कळते. बाप नसल्यावर किती हालअपेष्टा होते हे त्या लेकाला विचारा, ज्याचा बाप या जगात नाही.बाप गेल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात त्यावेळी त्याच्या डोळ्यातून बरसणारे अश्रू सतत बापाची आठवण करून देत असते.एकेका वस्तूसाठी त्याला प्रत्येक वेळी तरसत रहावे लागते.दुस-यांचा बाप बघितलं की,मग त्यालाही आठवतो त्याचा बाप…ज्या बापाने अचानकपणे या जगातून एक्झिट घेतलेली असते.काय असतील त्या लेकाच्या वेदना.?.किती यातना होत असतील त्याच्या मनाला.?विचाराच एकदा तरी त्याला..तुमचं सुद्धा मन हेलावून जाईल.

        प्रत्येक मुलानी आपल्या बापाचं अस्तित्व आणि महत्व समजून जगायला पाहिजे.झाड कितीही मोठ्ठं झालं तरी, त्याची मूळे कापली तर ते टिकू शकत नाही‌.जीवनाचं गणितही असच असते,ते ज्याचे त्याने ओळखून जगायला पाहिजे.त्या देव माणसाला कधीतरी सांगायला हवं.बाबा मला तुझा अभिमान वाटतो म्हणून.

आजकालची मुलं तर सदानकदा बापावर चिडत असतात की,तुम्ही आमच्यासाठी काय केलय म्हणून, त्यावेळी काय वाटत असेल त्या बापाला…विचार करा एकदा? ?

  एकएक पैसा काटकसर करून बाहेरगावी शिकणा-या मुलाला बाप पैसा पाठवतो.आणि हाच मुलगा तिकडे पैशाची उधळपट्टी करतो…पटतयं का बघा तुमच्या मनाला?

    म्हणूनच संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा हा बापच असतो.संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा हा बापच असतो.बाप जिवंत असेपर्यंत तरी बापाची किंमत तुम्हाला कळू द्या,एवढीच कळकळीची विनंती.शेवटी एवढच म्हणावसं वाटते..

                        लई अवघड हाय गड्या

                             समजाया बाप रं…

                   वृंदा पगडपल्लीवार,सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये