देशाला शक्तीशाली बनविण्याची ताकद युवावर्गात आहे – मोहनबाबू अग्रवाल
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘कोणत्याही देशाची ताकद व प्रगती मोजण्याचे मापदंड हे तेथील उद्योग, गगनचुंबी इमारती, सडका, शेती व संसाधन संपन्न प्रदेश नसून तेथील युवावर्ग कसा आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच देशाला शक्तीशाली बनविण्याची ताकद युवावर्गात आहे, असे प्रतिपादन स्थानिक अहिल्यादेवी होळकर सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘कौतुक सोहळ्यात’ 31 मे रोजी जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक इमरान राही, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, अहिल्याबाई होळकर समितीचे अध्यक्ष प्रा. राजू गोरडे व माजी मुख्याध्यापक रामेश्वर लांडे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले कोणत्याही क्षेत्रात आपले करीअर बनविताना आपण आपल्या देशाचे व समाजाचे ऋणी आहोत याचे भान ठेवून देशाचे कर्तृत्ववान नागरिक बना, असा सल्ला दिला तर इमरान राही म्हणाले जीवनात उच्च ध्येय ठेवा व त्यानुसार आपले यशाचे शिखर गाठा पण असे करताना देश प्रथम हि भावना समोर ठेवावी.
अहिल्यादेवी होळकर सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी व बारावीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यात सायली भुजाडे, दिशा साटोणे, तनुजा टाकोणे, दिव्यानी दैने, स्पंदन अलोणे, चैताली पातुरकर, ॠतुजा हिंगे, विराज भागवत, मूशफिया खान, सोहन चौधरी, श्रेया ठोंबरे, सौंदर्या फुलमाळी, सानीया बावने, शिवम शिवरकर, ॠतीका बुदबावरे, सार्थक नरांजे, तनुजा गव्हाळे, सलोणी कातकर, संस्कृती भांडेकर, चैतन्य चंदनखेडे, दिव्यानी विरूळकर, अनशुल इरखेडे, अनुष्का निशाणे, डाॅली गोथवानी, मोहीत हजारे, सायली भुजाडे, हर्षदा मांदाडे, नंदीनी शिवरकर व चिराग गोधवानी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजू गोरडे यांनी करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याबाबत मनोगत व्यक्त केले.
संचालन प्रा राजेंद्र बानमारे व जितेंद्र गोरडे यांनी तर आभार पद्माकर कांबळे यांनी मानले.