विविध उपक्रमातून बोलीभाषेच्या शब्दांची पेरणी करा – अरूण झगडकर
झाडीबोली अभाशी उपक्रम मालिकेची सांगता

चांदा ब्लास्ट
मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल तर महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा टिकणे आवश्यक आहे. बोली टिकली तरच भाषा टिकेल त्यासाठी विविध उपक्रमातून बोली भाषेतून शब्दांची पेरणी करा. असे प्रतिपादन झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर यांनी केले.
झाडीबोली साहित्य मंडळ बल्लारपूर शाखेच्या वतीने विविध आभासी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अलग या साहित्य प्रकारावर मार्गदर्शन करण्याकरिता बल्लारपूर येथील जुबेदा मंजिलच्या लेखिका अर्जुमन शेख, गडचिरोली येथील सुप्रसिद्ध अलगकार उपेंद्र रोहणकर यांनी मार्गदर्शन केले. मुक्तछंद या काव्य प्रकारावर कवी भाविक सुखदेवे ब्रम्हपुरी व राजुरा येथील सुप्रसिद्ध कवी विरेनकुमार खोब्रागडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
अभंग लेखन कसे करावे याविषयी विस्तृत विवेचन गोंदिया येथील सुप्रसिद्ध अभंगकार मुर्लीधर खोटेले तर भद्रावती येथील बोलीतून अभंग रचना करणारे कवी अरुण घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. अष्टाक्षरी काव्य प्रकारातील शास्त्रशुद्ध माहिती कवी अरुण झगडकर यांनी मांडली, तर गजलेचे बारकावे आणि तंत्र यावर गझलकार दिलीप पाटील तसेच झाडीपट्टीचे गझलकार लोकराम शेंडे यांनी गजलेवर विस्तृत मार्गदर्शन केले.
झाडीबोली साहित्य मंडळ बल्लारपूर शाखेतर्फे अशा विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.आज पर्यंत महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विविध नामवंत लोकांच्या मुलाखती सुद्धा घेऊन साहित्यसेवा निरंतर सुरु आहे. महिनाभर चाललेल्या या सर्व आभासी उपक्रम मालिकेचे सूत्रसंचालन तालुका शाखाध्यक्ष प्रशांत भंडारे, कवी सुनील बावणे, कवी सुनील पोटे यांनी केले.