महात्मा फुले महाविद्यालयात ‘घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान
संविधान हा समाजाचा आरसा आहे - प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.ज्यांनी भारतीय समाजाला देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व इतर बाबतीत मौलिक असे योगदान दिले. या त्यांच्या संघर्षाची जाण विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2024 ला तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. 12 एप्रिल 2024 ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद शंभरकर (राज्यशास्त्र विभाग प्रमुख), सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर हे तर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. बादलशाहा चव्हाण होते. डॉ. किशोर चौरे, प्रा. दिवाकर मोहितकर यांची विचारपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून झाली.
यावेळी प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर यांनी “घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर मार्गदर्शन करतांना मानवी जीवनात संविधान कसे महत्वाचे आहे,आपले अधिकार व कर्तव्या विषयी जागृत असले पाहिजे संविधान निर्माण होण्याची पार्श्वभूमी व त्याकरिता घटनाकारांना करावा लागणारा संघर्ष याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. भारतीय संविधान हा समाजाचा आरसा असतो असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य, डॉ. बादलशाहा चव्हाण म्हणाले की, ” भारतीय समाजाचा भूतकाळचं नव्हे तर वर्तमान व भविष्यकाळही भारतीय संविधानाच्या माध्यमातून उजळून निघणार आहे. भारतीय समाजाला अमूल्य अशी देणगी देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय अशी घोषणा करून देशाला आपले सर्वस्व अर्पण केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चिरकालीन टिकणारे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी तर आभार प्रा. दिवाकर मोहितकर यांनी मानले. या प्रसंगी ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.