जिवती पंचायत समितीताचा कारभारीच नियमित येईना!
कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नेमण्याची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रणालीत पंचायत समितीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचायत समितीमध्ये ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जाते. शिक्षण, आरोग्य, पंचायत, कृषी, बांधकाम, पाणीपुरवठा यांसह विविध विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत योजना पोहचविल्या जातात.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिवती पंचायत समिती कार्यालयात कार्यालय प्रमुख प्रभारी गटविकास अधिकारी हे कार्यालयात नियमित येत नाहीत. त्यामुळे कामांसाठी आलेल्या नागरिकांना हताश होऊन परतावे लागत असून जिवती पंचायत समितीताला कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.
जिवती हा आदिवासी, डोंगराळ व दुर्गम तालुका आहे.सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यातील गावांची दशा अजूनही कायम आहे.पिढ्यांन पिढी पासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत. मिळविणयासाठी अधिकारी व पदाधिकारी कधीही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत अशा विविध समस्यांच्या कचाट्यात जीवन जगणाऱ्या नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची गरज आहे.तात्कालीन गटविकास अधिकारी डॉ.भागवत रेजीवाड यांची महिनाभरापूर्वी पांढरकवडा येथे बदली झाली.तेव्हा पासून राजुरा येथील गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांच्याकडे जिवती पंचायत समितीचा प्रभार सोपविण्यात आला आहे मात्र तेही नियमितपणे येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
मागिल आठवडाभरापासून ते पंचायत समितीत आलेच नसल्याने अनेक गावांतून कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.नियमित अधिकारी येत नसल्याने अनेक कर्मचारी सुध्दा दांडी मारून निघून जातात आणि राहिले तरी अधिकारीच नाही आम्ही काय करावे म्हणून नागरीकांची टोलवाटोलवी करतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागले आहेत.संबधित प्रकार थांबविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभिर बाबीकडे विशेष लक्ष देऊन जिवती पंचायत समितीताला कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणीही जनतेच्या वतीने केली जात आहे.