ढोरवासा परिसरात उद्योगधंद्यांची निर्मिती करा
माजी पं.स. उपसभापती नागोबा बहादे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
तालुक्यातील विविध गावातील 2हजार सातशे एकर जमीन औद्योगिक विकास महामंडळातर्फे गेल्या 25 वर्षांपासून संपादित करण्यात आली. मात्र या जागेवर अद्याप कोणतेही उद्योग सुरू करण्यात न आल्याने परिसरातील बेरोजगार हे रोजगारापासून वंचित झालेले आहे. त्यामुळे येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या जागेवर उद्योग निर्मिती करावी अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती नागोबा बहादे यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या एका निवेदनातून केली आहे. तालुक्यातील तेलवासा, चारगाव, ढोरवासा, चिरादेवी, पिपरी रुयार रिठ, लोणार रिठ येथील 2700 एकर शेत जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 25 वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली.
मात्र या जागेवर अद्याप एकही उद्योग उभारण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची जमीनही गेली व रोजगारही उपलब्ध न झाल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे. गेल्या 25 वर्षांपासून या जमिनीवर कोणताही उद्योग आलेला नाही. सदर जागेला लागून वर्धा नदीचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून जवळच रेल्वे लाईन असल्यामुळे ही उद्योगासाठी आदर्श जागा आहे. त्यामुळे या जागेवर उद्योगधंदे सुरू करून या परिसरात रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती नागोबा बहादे यांनी निवेदनातून केली आहे.