विवाहानंतर संसार सुख, अपत्य सुख हे प्रत्येक पतीपत्नीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक
स्त्री-पुरुष नात्याचा वेगळा पदर उलगडणारे - हम दोनो हे नाटक म्हणजे आगळी वेगळी प्रेम कथा
चांदा ब्लास्ट
स्त्री आणि पुरुष यातील सनातन संबंध फार महत्त्वाचे आहेत. हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहूच शकत नाही हे काळाने सतत सिध्द केले आहे. हम दोनो हे नाटक म्हणजे यांच्यातील नात्याचा एका वेगळ्या पदराने उलगडा करणारे आहे. डॉ हेमंत कुलकर्णी लिखित हे नाटक जळगावच्या नाट्यरंग या संस्थेने सादर केले.
सर हे पात्र या नाटकाचा लेखकही आहे आणि सूत्रधार सुध्दा. तो क्रमाक्रमाने दोन अंकात नाटक घडवत जातो व ते पुढे नेत रहातो. व त्याचा समर्पक शेवटही करतो. रवी आणि नारायण हे या नाटकाचे नायक तर रंजना व दमयंती या नायिका. या चार तरुण जिवांच्या भावविश्वावर हे नाटक फुलत जाते. यांच्या एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते थेट अपत्याची चाहूल लागण्यापर्यंतचा हा कथेचा हसत खेळत प्रवास आहे. कोणाच्याही प्रेम कथेला जशी सुरवात होते तशी यांच्या पण होते. यात नेहमी प्रमाणे एकमेकांना आपल्या प्रेमात पाडण्यासाठी ज्या काही घडामोडी होतात, संघर्ष येतात तसे थोड्या फार फरकाने कोणत्याही प्रेमासाठी आसुसलेल्याच्या आयुष्यात घडतात. पण खरी संघर्षीची ठिणगी पडते ती यांच्या विवाहा नंतर.. संसार सुख, अपत्य सुख हे प्रत्येक पतीपत्नीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो. प्रत्येकाला आई किंवा बाबा व्हायचं असतं. किंबहुना त्यासाठीच हा संसाराचा सारीपाट मांडला जातो.
या संघर्षावर नुसते प्रश्न मांडून लेखक थांबत नाही किंवा त्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोडून देत नाही तर यावर आजच्या काळाला धरुन, योग्य वाटतील अशी समर्पक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या नाटकातून होतो.
हे नाटक म्हणजे एक आगळी वेगळी प्रेम कथा आहे. ही कथा दोन अंकात दोन वेगवेगळ्या पातळीवर घडते. दिग्दर्शक अपूर्वा कुलकर्णी यांनी त्याला उत्तम ट्रीटमेंट दिली आहे.चौदा लोकेशन्स उभ्या करतांना नेपथ्य, प्रकाश आणि संगीत हे परस्परांशी कसे एकजीव असतील याचा प्रामुख्याने विचार दिग्दर्शकाने केला.
डॉ हेमंत कुलकर्णी, अम्मार मोकाशी, लोकेश बारी,अमोल ठाकूर, दीप्ती बारी ,नेहा पवार यांच्यासह इतर कलावंतांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.