ताज्या घडामोडी

कुऱ्हाडीच्या वाराने महिलेसह दोन तरुण मुलींची हत्या – वडिलांनीच घेतला मुली व पत्नीचा बळी

शनिवारची रात्र ठरली तिघींसाठीही काळरात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

सुधाकर श्रीराम नागभिड

कौटुंबिक कलहातून 40 वर्षीय पत्नी, 20 व 17 वर्षीय मुलींचा बापानेच कुऱ्हाडीने हत्या केल्याची हृदयद्रावक आणि तितकीच खळबळजनक घटना नागभिड तालुक्यातील मौशी येथे घडली असुन ह्या हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार मौशी येथे तलमले कुटुंबीय वास्तव्यास आहे. अंबादास तलमले वय 50 वर्ष हे कुटुंबप्रमुख असुन त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तलमले कुटुंबात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे कळले आहे. अंबादास ह्यांचा मुलगा शनिवार दिनांक 2 मार्च रोजी बाहेरगावी गेला होता मात्र अल्का तलमले वय 40, तेजु तलमले वय 20 व 12 व्या वर्गात शिकणारी प्रणाली वय 17 ह्या घरीच होत्या. नित्यनेमाने आपली कामे आटोपून तिन्ही मायलेकी शनिवारी रात्री झोपी गेल्या.

मध्यरात्रीच्या वेळी अंबादास ह्यांच्यात जणु सैतान संचारला व त्याने कुऱ्हाडीने घरात निजलेल्या पत्नी व मुलींवर प्राणघातक हल्ला करून कुऱ्हाडीच्या वाराने तिघीही यमसदनी धाडले. थरकाप उडविणाऱ्या हत्याकांडाची माहिती कळताच नागभिड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी अंबादास तलमले ह्या अटक केली असुन हत्याकांडाची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ह्यांनी घटनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागभिड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये