प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना देखील अनेक आदिवासी बांधव मुलभूत सुख -सुविधा पासून वंचित आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गतिशील प्रयत्न होणे गरजेचे आहे.आदिवासीं लोककला व संस्कृती ही उत्तम आहे.निसर्गपूजक संस्कृती ही आजच्या पर्यावरण संपुष्टात येण्याच्या काळात अनुकरणीय असल्याचे मत सामजिक कार्यकर्ते तुषार बावणे यांनी व्यक्त केले. तसेच आज लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन होताना दिसत नाही.
जागतिकीकणानंतर आदिवासी समुदायाची भाषा व संस्कृतीचे अस्तित्व अबाधित ठेवत संरक्षण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन समाजसेवक तुषार बावणे यांनी केले. ते प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदुर येथील जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षीय भाषणातून सामजिक कार्यकर्ते माननीय बालाजी पुरी यांनी आदिवासी हे मूळ निवासी असून आदिवासी समुदाय हा निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला देव मानतो त्याला पुजतो लोककला, वारली चित्रकला, पारंपरिक,तारपा नृत्य, ढेमसा, रेला ही या समुदायाची ओळख आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांनी केले, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय तुषार बावणे,बालाजी पुरी,प्राचार्य नानेश्वर धोटे,प्रा.राहुल ठोंबरे प्रा. प्रा.मनीषा मरसकोल्हे प्रा.पंकज देरकर, प्रा.रोशनी खाटे,प्रा. सचिन पवार,प्रा.श्रीकांत घोरपडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी धनश्री चतुरकर हिने केले तर आभार प्रदर्शन शेखर कोहपरे यांनी मानले.